Get it on Google Play
Download on the App Store

जयद्रथवध - भाग ४

युद्ध सुरू झाल्यावर दोन स्पष्ट भाग पडले. कित्येक वीर व प्रचंड सैन्य अर्जुनाचा प्रतिकार करत होते तर दुसरीकडे द्रोणाचा प्रतिकार युधिष्ठिर, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर पांचाल वीर करत होते. अर्जुनाने सबंध दिवसभर कित्येक प्रमुख वीरांशी, काहींशी पुन्हापुन्हा, सामना करत व प्रचंड सैन्यसंहार करत जयद्रथाच्या दिशेने प्रगति चालू ठेवली. युधामन्यु व उत्तमौजा या दोन पांचाल राजपुत्रांकडे अर्जुनाचा रथ रक्षण्याचे काम होते. मात्र सुरवातीलाच, कृतवर्म्याने त्यांना अडवून धरले. अर्जुन पुढे निघून गेला. त्यानंतर दिवसभर त्याना अर्जुनाला गाठता आले नाही. सगळ्या कौरवसैन्याला वळसा घालून दिवस अखेरीला ते पाठीकडून अर्जुनापाशी पोचले.
द्रोणाला बाणांनीच वंदन करून व कृतवर्म्याला हारवून अर्जुन एकटाच सैन्यात घुसल्यावर, दिवसभर अनेकानी त्याला अडवले. अनेकाना त्याने मारले. सर्वांची यादी देत बसण्यात अर्थ नाही. दुर्योधन द्रोणापाशी जाऊन तक्रार करू लागला की तुम्हाला ओलांडून अर्जुन पुढे कसा गेला? तुम्ही वचन दिले नसते तर मी जयद्र्थाला परत जाऊं दिले असते. आता त्याचे रक्षण कसे करावे याची सर्वाना चिंता वाटते आहे. द्रोणाने उत्तर दिले की कृष्णाने रथ एवढ्या वेगाने नेला की माझे बाण त्याच्यापर्यंत पोचेनात. आता तो गेलाच आहे व समोर युधिष्ठिर आहे तर त्याला पकडण्याचा मी यत्न करतो. तुला मी मंत्र कवच बांधतो. म्हणजे तुला अर्जुनाचे बाण लागणार नाहीत. तूंहि शूरवीर आहेस तेव्हा तू अर्जुनाशी सामना कर. कवच बांधून दुर्योधन अर्जुनाला गाठण्यासाठी गेला. इकडे दिवसभर, अर्जुनाशी सामना करण्यासाठी मोकळे ठेवलेले सहा महावीर सोडून इतर अनेक वीरांनी द्रोणाला युधिष्ठिराला पकडण्यासाठी साह्य केले. युधिष्ठिर, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न व इतर पांडव व पांचालवीर यांनी या हल्ल्यांचा भार वाहिला.
अर्जुन हळूहळू जयद्रथाच्या दिशेने प्रगति करीत होता. अवंतीचे महारथी राजे विंद व अनुविंद यानी त्याला अडवले. त्याना अर्जुनाने मारले व त्यांचे सैन्य उधळून लावले. यानंतरची एक अद्भुत घटना म्हणजे, आपल्या घोड्याना विश्रांति व सेवा हवी आहे असे पाहून अर्जुन रथातून खाली उतरून फक्त एका धनुष्याने सैन्याचा प्रतिकार करत राहिला व कृष्णाने शांतपणे घोडे सोडून व त्याना खरारा करून, अंगात घुसलेले बाण काढून टाकून व हलकेच फिरवून त्याना परत हुशार केले व पुन्हा रथाला जोडले. अर्जुन व कृष्ण पुन्हा रथावर चढलेले पाहून कौरव योद्धे उदासीन झाले व जयद्रथ आता वाचत नाही असें म्हणू लागले. यावेळी मंत्रकवच बांधलेला दुर्योधन स्वत: अर्जुनाला भिडला. तो वृत्तांत पुढील भागात वाचा.