Get it on Google Play
Download on the App Store

किष्किंधा कांड - भाग ५

वर्षाकाळ संपेपर्यंत राम-लक्ष्मण त्या गुहेच्या आश्रयाने राहिले. रामाला शोक वाटला कीं लक्ष्मण त्याची समजूत करी. शरदऋतु संपल्यावरच रावणावर स्वारी करतां येणार होती. तोवर स्वस्थ बसणे भागच होते.
किष्किंधेत सुग्रीव तारा-रुमा यांच्यासह कामभोगात मग्न होता. शरद संपत आल्यावर हनुमानाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली. हनुमान हा राम व सुग्रीव या दोघांचाहि खरा हितकर्ता होता. मग सुग्रीवाने वानरवीर नील याचेकडून सर्व वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश कळवले.
सुग्रीवाकडून काही कळत नसल्यामुळे रामाला राग आला. ’सुग्रीव काही करीत नाही तर लक्ष्मणा तूं जाऊन त्याला आठवण दे व निष्क्रिय राहिलास तर वालीप्रमाणे मी तुलाहि शासन करूं शकतों असे सांग’ असे त्याने लक्ष्मणाला म्हटले. लक्ष्मणाला खूप राग आला पण रामानेच त्याला संयम न सोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने किष्किंधेस जाऊन सुग्रीवाला कडक भाषेत निरोप कळवला. सुग्रीव अजूनहि कामभोगातच दंग होता. हनुमानाने पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिली. ’रामाने लोकापवादाची पर्वा न करतां तुझ्यासाठी वालीला मारले’ याची जाणीव करून दिली. ( वालीचा वध हा रामायणकर्त्याच्या मतेहि दोषास्पद होता हे येथे स्पष्ट सूचित होते!)
लक्ष्मणाचा निरोप मिळाल्यावर सुग्रीवाला भय वाटले. त्याने तारेला लक्ष्मणाला समजावण्यासाठी पाठवले. तिने सांगितले की सुग्रीव स्वस्थ बसलेला नाही. लक्ष्मणाने तरीहि राग सोडला नाही तेव्हां वालीकडून पूर्वी ऐकलेले रावणाचे सैन्यबळ त्याच्या निदर्शनास आणले व मोठ्या सैन्याशिवाय युद्ध विफल होईल हे दाखवून दिले. वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश पाठवलेले आहेत हेहि सांगितले. मग लक्ष्मणाचा राग निवळला. सुग्रीवानेहि विनम्रभाव धरला. हनुमानाकडून पुन्हा सर्व वानरवीरांना समज देऊन दहा दिवसांत किष्किंधेला जमण्यास सांगितले. लक्ष्मण व सुग्रीव दोघानी सैन्य जमत आहे असे रामाला कळवल्य़ावर राम आनंदित झाला. ’सीतेच्या जीविताचा व रावणाच्या निवासस्थानाचा निश्चित ठावठिकाणा लागल्यावर मग पुढचे बेत आखूं’ असे त्याने म्हटले. कितीहि शोक असला तरी रामाचे परिस्थितीचे भान सुटलेले नव्हते! सुग्रीवाच्या मदतीशिवाय आपण एकट्याने काही करू शकत नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते.