Get it on Google Play
Download on the App Store

भविष्य धोक्यात आहे! ४

सभामंडपात धनंजयचे आगमन झाले. त्याचबरोबर धनंजयच्या नावाचा जयघोष सुरु झाला. धनंजय येण्याआधीच इतर प्रमुख नाग तिथे उपस्थित होते. मंचावर आल्यावर धनंजयने सर्वांना अभिवादन केले आणि मग त्याने सर्वांना नम्रपणे शांत केले. त्यानंतर त्याने मंचावरून बोलण्यास सुरुवात केली.

"माझ्या प्रिय नागबंधावंनो, आज मी तुमच्यासमोर एक राजा म्हणून नाही, तर एक बंधू म्हणून बोलणार आहे. राजाला ईश्वर स्वरुप समजण्याचा काळ आता निघून गेला आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमच्यापैकीच एक समजा. मला राजा म्हणून मिरवायची हौस कधीच नव्हती आणि भविष्यातही नसेल. पूर्वकाळात अनंताने माझ्या पित्याची हत्या करून, त्याच्याकडून हे पद हिरावून घेतले, माझ्या मातेला आणि आम्हा शंभर भावंडांना राज्याबाहेर काढून आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवले. जे योग्य नसून, माफीच्या तत्वात बसण्यासारखे नव्हते. म्हणूनच मला अनंताला मारून ह्या पदाचा स्वीकार करावा लागला."

"म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित आम्हाला राज्याबाहेर काढले जाणे हे जरी आमच्या हिताचे नसले तरी त्यामुळे नागप्रजातीचे हित मात्र नक्कीच होणार आहे. आम्ही जर राजमहालात वाढले असतो, तर कदाचित आम्हाला सामान्य नागप्रजेच्या स्थितीची, त्यांच्या संघर्षमयी जीवनाची, दुःखाची-कष्टांची कधी जाणीवच झाली नसती. फक्त नागासनावर बसून, सामान्य प्रजेच्या व्यथा समजत नसतात. त्यासाठी सामान्य नागांसारखे जीवन जगावे लागते. जे आम्ही आजवर जगलो आणि त्यामुळेच मी तुमची स्थिती समजू शकतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच ह्या स्थितीतून तुमची मुक्तता करणार आहे."

"आपली संस्कृती ही नागसंस्कृती आहे आणि आपली फक्त एकच जात असू शकते. ती म्हणजे...नाग. पण इतक्या वर्षात आपण काय केले? एकेकाळी पृथ्वीवर आपले वास्त्यव्य असताना, मनुष्य आपला गुलाम होता. पण नकळतपणे आपल्या पूर्वजांनी त्याचीच संस्कृती आत्मसात केली. पूर्वी आपण, फक्त नाग म्हणून ओळखले जात होतो. पण आज आपणही मनुष्याप्रमाणेच आपल्या जातीच्या आधारे ओळखले जाऊ लागलो. खरेतर जाती बनण्यामागे एकच उद्देश असू शकतो, तो म्हणजे कामांची विभागणी. ज्याला जे कार्य करता येते त्या कार्यात अधिक प्रगती करता यावी आणि त्याने त्याच्यासारख्या इतरांनाही ते कार्य करण्यासाठी प्रेरीत करावे, त्याने त्यांचे मार्गदर्शन करावे. जेणेकरून आपला समाज पुढे जावा. फक्त यासाठीच जातींची निर्मीती झाली होती. पण आज हे चित्र खुप बदललेले आहे. आपल्या कार्यावरुन आपली ओळख होऊ लागली आहे. त्याआधारेच आपल्या जातीची तुलना इतर जातीच्या नागांशी होऊ लागली आहे. जी आपल्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे."

"पूर्वी आपण फक्त नाग म्हणून ओळखले जायचो. त्यानंतर आपल्यातल्या शक्तींवरुन, गुणांवरुन आणि कौशल्याच्या आधारे आपण विभागले गेलो. ज्याला आपण आपली जात म्हणू लागलो. ज्यामुळे पुढे जाऊन आपण आपल्यातील, शक्ती, गुण आणि कौशल्य कशाप्रकारे उच्च किंवा निच दर्जाचे आहेत; हे ठरवू लागलो. ज्यामुळे आपण एकमेकांपासून दुरावलो गेलो. ज्याचा परिणाम आपल्या मनावर झाला आणि पर्यायाने आपल्या समाजावरही झाला. नेमका याच गोष्टींचा फायदा घेऊन, मनुष्याने आपल्याला नमवले. जो तुच्छ मनुष्य आपला गुलाम होता, त्याच्याशीच आपण करार करून बसलो. ही फार मोठी शोकांतीका आहे. म्हणजे आपले आपापसातील मतभेद आपल्याला इतके मोठे वाटू लागले की, आपण आपल्या हिताकरिता सुद्धा एकत्र येऊ शकलो नाही. तुमच्याच जातींच्या प्रतिनिधी नागांनी, मनुष्याशी करार करण्यास गुप्तपणे सहमती दिली. जी पर्यायाने तुमची सहमती ठरली. आणि मग आपल्याला नागलोकी येऊन रहावे लागले. परंतू एक गोष्ट नेहमीच तुमच्या लक्षात ठेवा, तुमच्या जातीच्या प्रतिनिधींना तुमच्या हिताशी काहीही घेणे देणे नाही. त्यांच्यामुळे पृथ्वीवर न जाण्याचा करार झाला खरा पण तो पाळला गेला फक्त सामान्य प्रजेकडून. तुमच्या पूर्वज प्रतिनिधींनी तुम्हाला इथे टाकले पण ते स्वतः मात्र अधून-मधून गुप्तपणे पृथ्वीवर वास्तव्यास जात होते. आणि मनसोक्त मनुष्य रक्त पिऊन, त्यांच्या स्वादिष्ट हृदयाचे सेवन करुन परतत होते."

"मला माहित आहे, गुप्त मार्गाची रहस्ये आजवर फक्त काहीच ठरावीक नागांपुरतीच मर्यादित ठेवली गेली होती. जी आजपासून सर्वांना माहित होणार आहेत. पण त्याआधी मला मनुष्याकडून आलेली आपली, समाजव्यवस्था नष्ट करायची आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. जो आता राहिलेला नाही. म्हणून आता, आपल्यालाही काळानुसार बदलले पाहिजे. माझ्या मते सर्व नाग समान आहेत. ज्याला जे कार्य जमते, त्याने ते करावे. आणि ज्याला ते करता येणे शक्य नाही, त्याला त्यासाठी साहाय्य करावे."

"इतकी वर्षे सामान्य प्रजेमध्ये राहिल्याने, माझ्या असे लक्षात आले आहे की, आपल्या समाजात दोन प्रकारचे नाग आहेत. त्यातील काही बौद्धिक दृष्ट्या सक्षम आहेत, तर काही शारीरिक दृष्ट्या. त्यामुळे कधी बुद्धीजीवी नाग इतर नागांच्या अल्पबुद्धीचा लाभ घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात. तर कधी शारिरीक दृष्ट्या सक्षम असलेले नाग आपल्या शारीरिक बळाचा वापर करुन, इतरांवर अत्त्याचार करतात. ज्यांच्याकडे बळ आणि बुद्धी दोन्ही नाही त्यांचा ह्या समाजात टिकाव लागूच शकत नाही."

"आपल्या नागप्रजातीच्या हितासाठी आपण बळ आणि बुद्धी या दोन्ही गुणांची उपासना केली पाहिजे. बुद्धीशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. तर बळाशिवाय आपले संरक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मिसळून राहिलो पाहिजे. ज्यांच्याकडे बौद्धिक क्षमता आहेत त्यांनी अज्ञानी नागांना साहाय्य करावे आणि ज्यांच्याकडे शारिरीक बळ आहे, अशा नागांनी शक्तिहीन नागांना सहाय्य करावे. यातच आपले हित सामावलेले आहे."

"यापुढे नागलोकात दोन गोष्टी होतील. त्यातील प्रथम गोष्ट म्हणजे आजपासून सर्व नाग समान असतील. मग ते कोणत्याही जातीचे असोत. यापुढे कोणालाही विशेष प्रकारची वागणूक दिली जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या सामर्थ्याच्या बळावरच सन्मान प्राप्त करता येईल; पण कोणालाही आपल्या शक्तींच्या बळावर इतर शक्तीहीन नागांवर अन्याय करता येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे  यापुढे मनुष्य आपला गुलाम असणार आहे. प्रत्येक नागाला आपल्या गुलामीसाठी आणि भक्षणासाठी वर्षाला शंभर मनुष्यावर अधिकार गाजवता येईल. जेणेकरुन नागांचे जीवन सुखकारक होईल. आता मी पृथ्वीकडे जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाची रहस्ये तुम्हाला सांगणार आहे."

तेवढ्यात तिथे उपस्थित नागांच्या समुहातून कोणीतरी धनंजयला आवाज दिला. त्या आवाजाने धनंजयचे लक्ष त्वरित वेधले गेले. तो आवाज एका तरुण नागाचा होता. बहुतेक त्या नागाला धनंजयशी काहीतरी बोलायचे होते. पण तो बोलत असताना, अचानक त्या नागाने धनंजयला आवाज देऊन त्याचे बोलणे खंडित केले. या गोष्टीचा मात्र धनंजयला फार राग आला होता. पण तरीही त्याने तसे न दर्शवता त्या तरुण नागाला पुढे मंचावर येण्याचे आवाहन केले. तसा तो नाग गर्दीतून मार्ग काढत पुढे येऊ लागला. आता तो धनंजयपासून काहीच अंतरावर उभा होता. परंतू धनंजय मंचावर होता आणि तो मंचाखाली. त्याच्याकडे बघुन तो एक सामान्य नाग होता हे स्पष्ट झाले होते. पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. जे सर्वांनाच जाणवत होते. मंचाजवळ येताच तो धनंजयच्या डोळ्यात डोळे टाकून एकटक बघू लागला. धनंजयने त्याला मंचावर येण्याचे आवाहन केले, तसा तो हलक्या पावलांनी मंचाच्या पायऱ्या चढू लागला. मंचावर येताच, त्याने धनंजयला मिठी मारली. आणि तो त्याच्या कानात काहितरी कुजबुजला. तो येताच धनंजयच्या वागण्यामध्ये व त्याच्या देहबोलीमध्ये काहीतरी बदल नक्कीच झाला होता. हे मंचावरील इतर नागांना प्रकर्षाने जाणवू लागले. धनंजयच्या चेहऱ्यावरील भाव आता थोडेसे बदलले होते. तो आता पूर्वीपेक्षाही अधिकच नम्र दिसू लागला होता."आता माझे हे मित्र तुमचे मार्गदर्शन करतील." असे धनंजयने मंचावरुन घोषित केले. आणि त्या नागाला मंचावरुन बोलण्याची संधी दिली. हे सर्व काय सुरु आहे? तो नवीन नाग कोण आहे? आणि आता धनंजय गुप्त मार्गाची रहस्ये सांगणार असताना, या तरुण नागाला मध्येच काय बोलायचे आहे? त्यापेक्षाही मोठे आश्चर्य म्हणजे धनंजयने आपले भाषण बाजुला ठेवून, या सामान्य नागाला मध्येच बोलण्याची संधी कशी काय दिली? असे कितीतरी प्रश्न सर्व नागांच्या मनात त्यावेळी उपस्थित झाले होते. त्यामुळे आता ते सर्व आपापसात कुजबुज करु लागले होते. तितक्यात तो नाग बोलू लागला.

"सर्वप्रथम... महाराजांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी कोण आहे? आणि मला तुम्हाला काय सांगायचे आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्व उत्सुक असाल. पण त्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगणार आहे हे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे काही वेळ तुम्ही आपल्या मनातील विचार बाजूला ठेवून, माझे बोलणे शांत चित्ताने ऐकून घ्या. अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे."

"नागराज धनंजयचे बोलणे थांबवून, मी मध्येच आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तरी आपण माझा विरोध केला नाही हे पाहून मला खुप आनंद झाला आहे. याचाच अर्थ नागांमध्ये आजही शिस्त टिकून आहे. परंतू हीच गोष्ट जर पृथ्वीवरील मनुष्याच्या वाबतीत घडली असती, तर तेथील राजाने अशाप्रकारे स्वतःचे बोलणे बाजूला ठेऊन, एखाद्या सर्वसामान्य मनुष्याला बोलण्याची संधीच दिली नसती आणि राजाचे बोलणे मधेच थांबवले म्हणुन त्याला शासनही केले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या सर्वसामान्य जनतेलाही आपल्यातीलच एक सर्वसामान्य मनुष्याचे असे वागणे सहन झाले नसते. त्यामुळे अशाप्रसंगी त्यांनी आरडा-ओरडा, गडबड गोंधळ करुन ती सभा तिथेच संपवली असती. थोडक्यात या गोष्टीवरुन, नागांकडे आजही शिस्त आणि इतर सर्वसामान्य नागांविषयी आपुलकीची भावना शिल्लक आहे. जी मनुष्याकडे नाही ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते."

हे ऐकल्याबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या नागांनी आपल्या तोंडातुन एका विशिष्ट पद्धतीचा आवाज काढून, " आम्ही याच्याशी सहमत आहोत" हे दर्शवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून त्या नागाने पुन्हा बोलयला सुरुवात केली.

"माझ्या मित्राचे, धनंजयचे काही विचार नागप्रजातीच्या उद्धारासाठी खरोखरच आवश्यक आहेत. त्याच्या विचारांचा मी आदर करतो. राजपरिवारातील असूनही इतकी वर्षे त्याने, त्याच्या मातेने आणि त्याच्या भावंडांनी सामान्य नागाप्रमाणे जीवन व्यतीत केले. त्यामुळे त्याला वाटणारी सामान्य नागांची चिंता स्वाभाविकच आहे."

"त्याच्या समानतेच्या प्रस्तावाचे मी स्वागत करतो. पण त्याच्या दुसरा प्रस्ताव मला मान्य नाही." (हे ऐकताच सर्व नागांचे कान टवकारले गेले) हा नाग काय बोलत आहे? धनंजयच्या बाजूने इतकी मोठी नागशक्ती असताना, अशा सामान्य नागाने त्याचा विरोध करावा? हे सर्वांसाठीच मोठे आश्चर्यकारक होते. धनंजय अजुनही शांतच होता. पण नागराणी आणि मंचावरील इतर नाग मात्र क्रोधीत दिसत होते.

"धनंजयच्या म्हणण्याप्रमाणे आपले पुर्वज पूर्वी लाखो वर्षे जगत होते. पण आज आपले आयुर्मान कमी होऊन जवळपास फक्त दहा हजार वर्षाचेच झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्वी मनुष्याचेही आयुर्मान हजारो वर्षाचे होते. पण आज त्याचेसुद्धा आयुर्मान कमी होऊन, तो फार-फारतर शंभर वर्षे जगू शकतो. याचाच अर्थ असा आहे की, पृथ्वीलोक असो किंवा नागलोक असो, काळाचा परिणाम सर्वत्र होत असतो. अर्थातच तो पृथ्वीवर वेगळा परिणाम करतो आणि नागलोकी वेगळा. नागलोकातील काळ हा पृथ्वीवरील काळाच्या तुलनेत फारच संथ गतीने पुढे जातो. तरीही नागांचे आयुर्मान मनुष्याच्या आयुर्मानाच्या तुलनेत पूर्वीपासूनच जास्त आहे हे मात्र नक्की. पण जर आपण पृथ्वीलोकात जाऊन राहू लागलो, तर मात्र आपल्यावरही पृथ्वीवरील काळाचा परिणाम होऊन आपले आयुर्मान ह्यापेक्षाही कमी होईल. याउलट जर मनुष्य नागलोकी येऊन राहू लागला, तर त्याचेही आयुर्मान कितीतरी पटींनी वाढेल."

"काळाचा परिणाम गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतो. साहजिकच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नागलोकातील गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त असल्याने तिथे काळ जलद गतीने पुढे जातो. राहिला प्रश्न आपले आयुर्मान वाढविण्याचा त्याबद्दल मी आधीच सांगीतले आहे की, ज्याप्रमाणे आपले आयुर्मान कमी झाले आहे, त्यापमाणे मनुष्याचेही आयुर्मान कमी झाले आहे. आपले पूर्वज त्यावेळी आपल्यापेक्षा जास्त जगायचे कारण तो काळ वेगळा होता. जो दुर्दैवाने पुन्हा परत कधीही येणार नाही. आपल्या आयुर्मानाचा आणि मनुष्य रक्ताचा काहीही संबंध नाही. त्यामुळे मनुष्य रक्त प्राशन केल्याने आपले आयुर्मान वाढेल, त्याच्या हृदयाचे सेवन केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू, या सर्व भ्रामक कल्पना आहेत. आपले पूर्वज जरी तसे काही करत असले, तरी त्यामुळे आपले आयुर्मान वाढेल हे सिद्ध होत नाही. पुर्वीचा काळ वेगळा होता. त्याकाळी जरी आपल्या पूर्वजांना असे करणे शक्य असले, तरी आज आपल्याला तसे करता येणार नाही. पूर्वीचा मनुष्य विकसित नव्हता. त्याची बुद्धीही मर्यादित होती. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी त्याच्यावर अगदी सहजरीत्या विजय मिळवुन, त्याला आपले गुलाम केले होते. पण आजचा मनुष्य काळानुसार विकसित झाला आहे. जरी त्याच्याकडे आपल्याप्रमाणे अद्भूत शक्ती नसल्या, तरी त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर, त्याच्या शरीरक्षमतेसाठी अशक्य असणाऱ्या गोष्टीही करून दाखविल्या आहेत. त्याला आता पृथ्वी, अग्नी , वायू, जल ही तत्वे नियंत्रित करता येतात. आकाश तत्वावर विजय मिळवून तो आता यंत्राच्या सहाय्याने अवकाश प्रवासही करु लागला आहे. आपण विचारही करु शकणार नाही अशी यंत्रे बनवून त्याने आपले जीवन सुखकारक केले आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या संरक्षणासाठी विविध प्रकारची शस्त्रे निर्माण केलेली आहेत. त्यात अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यांसारख्या विध्वसंक शस्त्राचाही समावेश होतो. ज्यांच्या वापराने आपला संपूर्ण नागलोकही क्षणार्धात नष्ट होऊ शकतो. त्यामुळे आपण विचारही करु शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते."

"माझ्या माहितीप्रमाणे आज पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या नागलोकातील नागांच्या संख्येच्या हजारो पटींनी अधिक आहे. त्याशिवाय आजही पृथ्वीवर मंत्रशक्तीद्वारे नागांना नियंत्रित करण्याची सिद्धी हस्तगत असलेले, मनुष्य अस्तित्वात आहेत. आपल्या सुदैवाने मनुष्याचे आयुर्मान अल्प असल्याने त्यांच्या जवळील ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला प्राप्त होते. त्यामुळे काळाच्या ओघात त्यांच्या जवळील अनेक रहस्ये नष्ट होतात. आपल्यासारख्या नागांच्या जीवनकालात मनुष्यांच्या शेकडो पिढ्या जन्म घेतात आणि मरुन जातात. त्यामुळे आजच्या काळातील मनुष्याला नागलोकाबद्दल किंवा आपल्या सारख्या इच्छाधारी नागांबद्दल काहीही माहिती नाही. काळाच्या ओघामुळे आपले अस्तित्व आता मनुष्यासाठी एक रहस्य बनले आहे. ज्या मोजक्या मनुष्यांना ही रहस्ये माहिती आहेत त्यांच्यावर इतर बहुसंख्य मनुष्याचा विश्वास नाही. त्यामुळे मनुष्य आपल्याबद्दल कुठलीही गोष्ट ठामपणे सांगू शकत नाही. तरीपण आपल्याला, आपल्या दिर्घ आयुर्मानामुळे मनुष्याची बरीचशी माहिती आहे. पृथ्वीवर गुप्तपणे वास्तव्य करणारे नाग हे आपल्याला मनुष्याची रहस्ये माहिती असण्यामागचे मुख्य कारण आहे. पण तरीही मनुष्याशी झालेल्या करारानंतर आजवर कोणताही नाग सामान्य मनुष्यासमोर अद्याप प्रकट झालेला नाही. आणि भविष्यातही होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. अन्यथा आपल्यावरच अनर्थ ओढावेल." इतके बोलून तो नाग काही क्षण गप्प झाला. तसे तिथे उपस्थित सर्व नाग आपापसात, सौम्य आवाजात कुजबुजु लागले. म्हणून त्याने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.

नागमणी एक रहस्य

प्रसाद सुधीर शिर्के
Chapters
नागमणी एक रहस्य मनोगत पार्श्वभूमी अपहरण १ अपहरण २ अपहरण ३ अपहरण ४ अपहरण ५ अपहरण ६ अपहरण ७ अपहरण ८ खरी ओळख १ खरी ओळख २ खरी ओळख ३ शोध सुरु आहे... १ शोध सुरु आहे... २ स्वप्न की सत्य? १ स्वप्न की सत्य? २ अपहरणाचे रहस्य १ अपहरणाचे रहस्य २ अपहरणाचे रहस्य ३ अपहरणाचे रहस्य ४ नागांची रहस्ये १ नागांची रहस्ये २ नागांची रहस्ये ३ युद्धाची तयारी १ युद्धाची तयारी २ युद्धाची तयारी ३ युद्धाची तयारी ४ युद्धाची तयारी ५ युद्धाची तयारी ६ युद्धाची तयारी ७ युद्धाची तयारी ८ मोहनचे रहस्य हिमालयात आगमन...१ हिमालयात आगमन...२ प्रकाशची गोष्ट १ प्रकाशची गोष्ट २ प्रकाशची गोष्ट ३ संकटाची चाहूल १ संकटाची चाहूल २ संकटाची चाहूल ३ संकटाची चाहूल ४ संकटाची चाहूल ५ भविष्य धोक्यात आहे! १ भविष्य धोक्यात आहे! २ भविष्य धोक्यात आहे! ३ भविष्य धोक्यात आहे! ४ उत्पत्तीची रहस्ये "स्वरुप बदलते!" पुनर्जन्म १ पुनर्जन्म २ पुनर्जन्म ३ विकासाची रहस्ये १ विकासाची रहस्ये २ विकासाची रहस्ये ३ भूतकाळातील घटनाक्रम १ भूतकाळातील घटनाक्रम २ तिच्या स्मृती १ तिच्या स्मृती २ तिच्या स्मृती ३ तिच्या स्मृती ४ तिच्या स्मृती ५ सत्यातील असत्यता १ सत्यातील असत्यता २ सत्यातील असत्यता ३ सत्यातील असत्यता ४ सत्यातील असत्यता ५ सत्यातील असत्यता ६