Get it on Google Play
Download on the App Store

जीवनी - थोडक्यांत

शिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 साली सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते. २००२ मध्ये गोव्यांत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.  

पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते.
मृत्युंजय(१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.

मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.
शिवाजी सावंत यांची कादंबर्‍यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.

मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

त्यांचे प्रमुख लेखन

  • अशी मने असे नमुने (व्यक्तिचित्रे -१९७५)
  • कवडसे (ललित निबंध)
  • कांचनकण (ललित निबंध)
  • छावा (छत्रपती संभाजीच्या जीवनावरील कादंबरी -१९७९)
  • छावा (नाट्यरूपांतर)
  • पुरुषोत्तमनामा
  • मृत्युंजय -(महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी -१९६७)
  • मृत्युंजय (नाट्यरूपांतर)
  • मोरावळा (व्यक्तिचित्रे -१९९८)
  • युगंधर (भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी -२०००)
  • युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन
  • लढत (सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र, दोन भागांत -१९८६)
  • शेलका साज (ललित निबंध-१९९४)
  • संघर्ष (कामगार नेते मनोहर कोतवाल यांचे चरित्र -१९९५)

शिवाजी सावंत ह्यांची लेखनशैली खूप वेगळी होती आणि त्यामुळेच व्यक्ती चित्रण ह्या प्रकारच्या लेखनात त्यांचा हातखंडा होता. मृत्युंजय हि त्यांची कादंबरी तुफान लोकप्रिय झालीच पण त्याच बरोबर छावा आणि युगंधर हि चरित्रे सुद्धा तुफान लोकप्रिय ठरली. 

सावंत ह्यांचे लेखन फक्त टीकेच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट नव्हते तर सामान्य माणसाच्या मनात सुद्धा त्याने तितकेच घर केले होते. त्यांची पुस्तके आज सुद्धा बेस्टसेलर यादीत असतात.