Get it on Google Play
Download on the App Store

बाळकृष्ण

मध्यरात्रीची वेळ. घनदाट अंधकार पडला होता. विजा चमकत होत्या. ढग गडगडत होते. पावसाची झडी लागली होती. थंडीमुळे सर्व जग अंगाची मुटकुळी करून गाढ झोपी गेले होते. अशा वेळी कैदेतच देवकी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. कळीच्या नारदाने येऊन त्याला प्रदक्षिणा केली. देवकीला शुभ लक्षणे भासू लागली. पण आपल्या भावाचा हट्ट आणि अत्याचार यांचा विचार मनांत येतांच तिच्या अंगाचा थरकाप उडाला. चेहेऱ्यावर निराशा पसरली. वसुदेवाचे हृदय भरून आले.

वासुदेव म्हणाला, “देवकी दे त्या तान्याला माझ्याकडे, कोठे तरी पोहोचवून येतो."

"डोळे भरून पाहू दे तरी थोडा वेळ माझ्या मुलाला." देवकी म्हणाली.

“देवकी असा काळ दवडला तर तेवढ्यांत कंसाच्या रूपाने त्याचा कर्दनकाळ येईल." वसुदेव म्हणाला.

देवकीनें नीट गुंडाळून एका टोपलीत घालून एका दुपट्यांत त्याच्या स्वाधीन केलें. वासुदेव काही विचार न करता तडक निघाला आणि जस जसा तो जाऊं लागला तस तसे एकेक दरवाजे उघडत गेले. पाहारेकऱ्याना गाढ झोप लागलेली होती. तो मथुरा नगरीच्या बाहेर निसटून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. पण अंधार म्हणजे मी म्हणत होता. वाटेचा अंदाज येत नव्हता. तरी तो मन घट्ट करून चालला होता.

तेवढ्यात त्याला प्रकाशाचा झोत दिसला. वाटले बहुतेक कंसाने आपल्या शोधासाठी मशाली घेऊन लोकांना पाठविलें आहे. त्याने तलवारीच्या मुठीवर हात ठेवून मागे वळून पाहिले. पण आजूबाजूला कोणीच नव्हते. प्रकाशाची किरणं सुद्धा कोठून हि येत नव्हती. ती येत होती त्याच्या डोक्यावरील टोपल्यातून.

यमुना नदी दुथडी भरून वाहात होती. पाण्याच्या आवाजानें कानठळ्या बसत होत्या. प्रवाहांत मगर, सांप वगैरे जीव जंतु बरेच होते. पाण्यांत पाऊल टाकावयाची वसुदेवाला हिंमत होत नव्हती. पण दुसरा मार्ग नसल्यामुळे तो तसाच पाण्यात शिरला. पाण्याला पाऊल लागतांच नदी दुभंग झाली आणि तिने त्याला वाट करून दिली. वसुदेव नदी पार करून पैलतिरी गेला. त्याला आठवलें तेथून जवळच नंद नांवाच्या त्याच्या मित्राचे घर होते. त्या मित्राला वसुदेवानें कंसाच्या आज्ञेवरून मारले होते व साखळदंडाने जखडले होते. त्याच मित्राने आपल्या बाळाला संभाळले तर किती बरें होईल, त्याच्या मनात आले. पण ते कसे जमणार ? असा विचार करीत तो वाट चालत होता. योगायोग असा की त्याच वेळी नंद हि आपल्या मृत नवजात कन्येच्या अंत्यक्रियेसाठी आला होता.

बाळंतपणाच्या वेळी यशोदा बेशुद्ध पडल्यामुळे तिला काहीच कळले नाही. दुसऱ्या दिवशी गांवांत इंद्र यज्ञाचा महोत्सव व्हावयाचा होता. पण या मृतकन्येची वार्ता गांवांत पसरली तर यज्ञात बाधा होईल म्हणून तो मुकाट्याने तिला उचलून घेऊन आला होता. चाहूल ऐकून

वसुदेव म्हणाला, "कोण? नंदच की काय? बरं झालं."

"कोण वसुदेव?" तो म्हणाला.

त्याच्या मनांत आले, याच वसुदेवाने मला मरमर मारले आणि माझ्या हातां पायांत साखळदंड घातला आणि तोच पण छे...!!! मी उगाच कशाला त्याला बोल लावू. कंस महाराजाची आज्ञा मोडण्याची त्याची प्राज्ञा नव्हती. त्याने किती तरी वेळां मला मदत नाही का केली? पण हा या वेळी येथे कसा येऊ शकला? आणि कशासाठी आला असाचा. असा विचार करीत करीत तो वसुदेवाजवळ येऊन पोहोचला.

दोघांनी एकदेकांना ओळखलें.

"रात्रीच्या अशा तूं भयानक वेळी येथे कसा....! सर्व काही ठीक आहे ना नंदा...!" वसुदेवाने प्रेमळ स्वरांत विचारले.

नंदाने येण्याचे सविस्तर कारण सांगितले आणि म्हणाला "ह्या मृत कन्येला फेकून देण्यासाठी आलो आहे."

थोडा वेळ थांबून त्याने वसुदेवाला विचारलें, "अन् तूं कसा?"

"माझी कर्मकथा काय सांगू? तुला सर्व काही माहीतच आहे. पहिले सहा पुत्र कंसाने मारले. म्हणून सातव्याला घेऊन आलों आहे. तूंच ह्याचे पालन कर." वसुदेव म्हणाला.

"अरे पण कंसाला हे कळले तर तो मला जिवंत ठेवील तरी का?" असें म्हणत त्याच्या पोटची मुलगी मेलेली होती.

वसुदेवाने कंसाच्या आज्ञेनें त्याला खूप मारले होते. तरी त्याचे हृदय कळवळले. एका अर्भकाला दुष्ट कंसाच्या हाती देण्यास त्याचे मन तयार होईना. म्हणून तो त्याला घेण्यास कबूल झाला.

“पण थांब मी अगोदर स्वच्छ स्नान करतो आणि मग घेतो त्याला." नंद म्हणाला.

इतक्यांत पाताळ गंगेने त्याला स्नान घातले. त्याने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले.

“परंतु हे कुणाला कलता कामा नये...!” वसुदेव म्हणाला.

“कोण कोणाला सांगायला जातो आहे? आपल्या दोघातच हे..!!" असें म्हणत त्याने शिशूला नंदाच्या स्वाधीन केलें.

"माती चांगलीच जड दिसते आहे..?" नंद म्हणाला.

तोच विष्णु सेवक गरुड, शंख, चक्र, शाङ्ग कौमोदकी वगैरेंनी येऊन त्या बालकाला नमस्कार केला. हे पाहून नंदानें हि मस्तक वाकविलें. आश्चर्य..! त्याच क्षणी त्याची बेडी निखळून पडली व तो मोकळा झाला. दोघांना बालकाच्या खुणा समजल्या.

"नंदा बाळाला नीट संभाळ."

"काही काळजी करू नकोस. पोटचा पोरच समज माझा. ह्या गांवचा राजाच होणार माझा बाळ. गांवांत जेथे जाईल तेथें दूध, दही, लोणी मिळेल घाला." नंदाने सांगितले.

दोघे जड पावलांनी आपापल्या मार्गाला लागले.

वसुदेवाच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पाहिले तर नंदाची मुलगी रडत असलेली दिसली. वसुदेवाने विचार केला, मुलास मूल, हेंच देवकीच्या पुढ्यांत ठेवावें. लगेच तो तिला उचलुन घेऊन गेला आणि आपल्या बंदिगृहांत जाऊन देवकीच्या पुढे ठेवलें. त्या दिवशी रात्री कंसाला भयंकर स्वप्ने पडत होती. त्याला दिसले की समुद्रांत धक्के खाणाऱ्या नावेप्रमाणे राजवाडा हालत आहे. धरणीकंपामुळे सारी मथुरा हेलकावे खात आहे. काळ्या कुरूप मातंग कन्या त्याच्या भोवती गोळा झाल्या असून त्याला मद्याचे प्याले भरभरून देऊन अंगलट करीत आहेत.

कंस त्या किळसवाण्या स्त्रियांना दूर लोटत आहे. इतक्यांत त्याला दिसले की एक अक्राळ विक्राळ राक्षस आपल्याकडे येत आहे आणि म्हणत आहे की,

“मी मध्वमुनीश्वराचा शाप आहे. आतां तुझे दिवस भरलेच समज, हा मी तुझ्यात प्रवेश करतो. अरे ए कंसाच्या भाच्या, तूं आता येथून जा. संपलें तुझें काम.”

कंस एकदम खडबडून जागा झाला व पलंगावर उठून बसला आणि आपल्या यशोधरा नांवाच्या दासीला बोलावून विचारले की येथे मातंग स्त्रिया आल्या होत्या का..! तिनें 'नाही' म्हणून सांगतांच त्याने बालाकी नावाच्या सेवकास पुरोहिताकडे पाठवून विचारविलें की धरणीकंप, उल्कापात, वादळ वगैरेंचे काय कारण आहे? त्याने परत येऊन सांगितले की ते म्हणत आहेत की

“आज आदिपुरुष भूतलावर अवतरले आहेत.”

कंसाचे काळीज चरकले. तरी सुद्धा त्याने अवसान आणून त्याला पुरोहिताकडे पाठविले, म्हणाला,

“कोणाच्या घरी त्याने जन्म घेतला आहे ? आणि त्याला आत्तां अवतार घेण्याचे काय कारण..!”

वालाकी बाहेर गेला आणि मागे फिरून बातमी आणली की वसुदेवाला मुलगी झाली आहे. कंसाला त्यावर विश्वास झाला नाहीं म्हणून त्याने वसुदेवाला विचारले. तो म्हणाला

“देवकीच्या कुशीत कन्याच आहे."

त्या मुलीला न मारण्यासाठी सर्वांनी कंसाला सांगितले. परंतु त्याने कोणाचे ऐकलें नाही.

"मुलगा असूं दे की मुलगी वसुदेवाचे संतान माझा काळ आहे. त्याला नष्ट केलेंच पाहिज."

म्हणून तावातावानें तो गेला. वसुदेवाचे हृदय धडकलें, त्याच्या मनात आले की आपण या मुलीला येथे आणल्या मुळेच ती मरणार. आपल्याला पाप लागणार. का आपण आपल्या मुलाला याच्या स्वाधीन करावें.....पण का? नको. ही मुलगी तर मेलीच होती. म्हणून तिचा बाप तिला टाकून गेला होता. म्हणून आपल्याला पाप लागणार नाही. त्याने आपले मन शांत केलें.

कंसाने देवकीच्या हातांतून त्या मुलीला ओढून घेतले. त्या सुलक्षणी मुलीला मारण्याची त्याला इच्छा होईना. परंतु देवकीचे सातवें संतान होतें तें. त्याला मारलेच पाहिजे. म्हणून त्याने जोराने तिला दगडावर आपटले.

"कंसा, तुझ्या नाशासाठींच मी वसुदेवाच्या कुळी जन्मलें आहे."

असे म्हणल त्या कन्येनें क्षणभर कात्यायिनीचे रूप धारण केले व अदृश्य होऊन गेली. पाहाट होऊ लागली. अशुभ टाळण्यासाठी तो अधीर होत चालला होता. कृष्णाच्या आगमनापासून सर्व गोकुळ आनंदसागरांत बुडून गेले होते. गाई, गवळी कृष्णलीलेत मस्त झाले होते. कृष्ण दहा दिवसांचाच होता. पूतनाने दूध पाजण्यासाठी त्याला घेतले. पण ती दुष्ट राक्षशीण तक्ताळ मरून गेली. एका महिन्याचा असतानाच त्याने शकटासुराला मारून टाकलें, पुढे कृष्णाच्या विरुद्ध दही लोण्याच्या चोरीच्या फार तक्रारी आल्याने यशोदा मातेने त्याला उखळाशी बांधले. तें उखळ ओढत ओढत बाळकृष्ण दोन अर्जुन झाडांच्या मधे घेऊन गेला आणि ती दोन्हीं झाडे पाडून टाकिली.

त्या झाडांत यमल व अर्जुन नांवाचे दोन राक्षस होते. ते मरून गेले. एकदा एक प्रलम्ब नांवाचा राक्षस नंदाचे रूप घेऊन आला व तो बलरामाला घेऊन जाऊ लागला. तें कपट बलरामाच्या ध्यानात येतांच त्याने एक असा ठोसा त्याच्या नाकावर मारला की तो तिरिमिरी येऊन खाली पडला तो उठलाच नाही. असाच आणखी एके दिवशीं धेनुक नावाचा राक्षस गाढवाच्या रूपाने ताडाच्या वनांत आला. त्याला हि कृष्णाने पाय पकडून दगडावर आपटून मारले. केशी राक्षस घोड्याच्या रूपाने आला होता. त्याला कृष्णाने मारतांच त्याचे दोन भाग झाले व तो मरून गेला.

एक दिवस कृष्ण गोपगोपींच्या बरोबर रासक्रीडा खेळत होता. त्यावेळी अरिष्टवृषभ आला. त्यामुळे सर्वजण घाबरून सैरावैरां पळू लागले. परंतु कृष्णाने त्याला मारून टाकून सर्वांचे संकट दूर केले. याच वेळी काही गोपाळांनी येऊन सांगितले की बलराम कालियाशी झुंज करीत आहे. हे ऐकून कृष्ण कसा स्वस्थ बसेल? तो धावला कालियाच्या घराकडे. त्याचा गर्व भंग करण्यासाठी त्याने यमुनेंत उडी मारली. गोपगोपींनी तिरावर असलेल्या लोकांनी कृष्णाला पाण्यात न उतरण्याविषयीं सांगितले.

एक वृद्ध गृहस्थ म्हणाला-"अरे, हिंस्त्र पशु सुद्धा त्या ठिकाणी पाणी पिण्यास गेले तरी परत येत नाहीत. मग तूं कशाला आपले प्राण धोक्यात घालतोस?"

पण कृष्णानें कोणाचे ऐकले नाही. कृष्ण कालियाच्या फणांवर उभा राहिला आणि त्याला पायाखाली असें दाबलें की त्याला कायमची आठवण राहील. कालिया त्याला शरण गेला व तेथून निघून जाण्याचे त्याने कबूल केले.

पण म्हणाला, "मला गरुत्मन्ताची भीति वाटते"

कृष्ण म्हणाला, “तुझ्या डोक्यावर माझ्या पायाचे चिन्ह उमटल्यामुळे तुला कोणी त्रास देणार नाही."

त्यानंतर तो कालिया समुद्रात निघून गेला. तेव्हांच एका शिपायाने येऊन सांगितले की बलराम व कृष्णाला कंसाने

“धनुर्मह उत्सव पाहाण्यासाठी बोलाविलें आहे.”

इकडे कंस त्यांची वाट पाहात होता. ते दोघे फार पराक्रमी आहेत असें त्याने ऐकले होते. ते दोघे मथुरेत येतांच मंत्र्यांकडून त्यांच्यावर दोन मस्त हत्ती सोडले. कृष्णाने त्यांचे दांत उपटून त्या दातांनीच त्यांना भोसकून मारले. राजवाड्यांत जातांना वाटेत त्यांना मदनिका नांवाची कुबडी दासी भेंटली. तिच्या जवळून त्यांनी अर्गजा घेतला व आपल्या शरिराला फासला, कृष्णान तिच्या कुबडाबर थप्पट मारली त्याबरोबर तिचे कुबड जाऊन ती चांगली झाली. तिच्या तबकांतील फुलांच्या माळा घेऊन त्यांनी गळ्यांत घातल्या व पुढे निघून गेले.

शस्त्रागाराजवळ तेथील रक्षक सिंहबलयाने त्यांना अडविले. त्याला मारून त्याच्या बाणाचे तुकडे करून टाकून ते दोघे स्यामवनांत गेले. दोघा भावांनी माजविलेला गोंधळ कंसाच्या कानावर गेला. त्याने त्या दोघांना मारून टाकण्यासाठी चाणूर व मुष्टिक नांवाच्या दोन मल्लांना तयार राहण्यास सांगितले, दरबारांत प्रवेश करतांच शिपायांनी त्यांना कंसाकडे इशारा करून सांगितले की,

“तें कंस महाराज आहेत त्यांना प्रणाम करा.”

परंतु त्यांनी दुर्लक्ष करून ते टाळले. कंस त्या दोघांकडे निरखून पाहात होता. कृष्णाचें तें पिळदार शरीर पाहून त्याला वाटले हाच तर आपला काळ नसेल? त्याचे हृदय धडकले. त्याने आपल्या मल्लांना इशारा केला. दोघे मल्ल दोघांच्यावर धावून गेले. पण त्यांनी त्या मल्लांच्या मानगुट्या पकडल्या आणि क्षणार्धात त्यांना यमपुरीस पाठविले. क्षणाचाहि विलंब न करतां कृष्ण सिंहासनाकडे धावला.

कंसाच्या झिंज्या ओढून त्याला खाली पाडले.

“जा यमलोकांत त्या मल्लांच्या भेटीला" असे म्हणून त्याच्या छातीवर बसून त्याला मारून टाकलें.

कंसाचे नोकर दोघांवर धावून गेले. पण वसुदेवाने सांगितले की हे दोघे माझे पुत्र आहेत. एक रोहिणीचा व एक देवकीचा यांना कोणी हि काही करू शकणार नाही. नंतर कृष्णाच्या आज्ञेवरून लोकांनी वसुदेव देवकींना कैदेतून सोडविलें. उग्रसेनाला हि बंधमुक्त केले आणि त्याला पुन्हां गादीवर बसवून राज्याभिषेक केला.

बाळकृष्ण

कथाकार
Chapters
बाळकृष्ण