Get it on Google Play
Download on the App Store

राजा आणि चोर

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पाटलिपुत्रावर उग्रसेन नांवाचा राजा राज्य करीत होता. तो फार शूर होता. त्याचे सरदार सुद्धा त्याच्या सारखेच पराक्रमी होते. यामुळे शत्रूवर सुद्धा त्याचा वचक होता. त्याला पाहतांच त्याचे शत्रू थरथर कापत असत. इतके असून सुद्धा त्याच्या सरदारांमध्ये काही सरदार अन्यायी व अत्याचारी पण होते. पण ते राजाच्या विश्वासांतील असल्याने त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोलू शकत नव्हते. उग्रसेनाच्या सैन्यांत एक सहदेव नांवाचा सैनिक होता तो फार शूर होता. त्याला आढळून आले की कांहीं दुष्ट सरदार प्रजेला त्रास देत आहेत व त्यामुळे विनाकारण राजाचें नांव बदनाम होत आहे.

सहदेवाला हे मुळीच आवडले नाही. म्हणून त्याने प्रजेच्या कल्याणासाठी त्या सर्व लोकांचा नायनाट करण्याचा निश्चय केला. जेव्हा जेव्हां संधी मिळे तेव्हां तेव्हां सहदेव त्या अत्याचारी दुष्ट सरदारांवर हल्ला करीत असे व त्यांना लुटून तें धन तो गरीब प्रजेला वाटून देत असे. काही दिवसांनी त्या दुष्ट सरदारांनी राजाकडे तक्रार केली की सहदेव डाकू झाला आहे. तो लोकांच्यावर हल्ले करून त्यांना लुबाडतो. अर्थातच राजाने त्याला पकडण्यासाठी सैनिक पाठविले. पण तो त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे राजाने त्याला लुटेरा ठरवून ज्याच्या हाती तो सांपडेल त्याने त्याला मारून टाकावें असा हुकूम सोडला.

काही दिवस गेले. एक दिवस रात्री उग्रसेन राजाला स्वप्नात एक देवी दिसली.

ती म्हणाली, “राजा..! ऊठ...! जाऊन चोरी करून ये. ही देवाची आज्ञा आहे असेंच समज."

राजा खडबडून जागा झाला. ह्या विचित्र स्वप्नामुळे, त्याला फार आश्चर्य वाटले, तरी तो तसाच डोळे मिटून पडून राहिला. तितक्यांत त्याला पुन्हां तीच देवी दिसली.

म्हणाली, “जर तूं चोरी केली नाहीस तर तुझें राज्य जाईल ही देवाची इच्छा आहे."

दोन वेळा त्याला तेंच स्वप्न पडले. तरी त्याने चोरी करण्यास जाण्याचा विचार केला नाही. परंतु यात काही तरी गूढ असले पाहिजे असे त्याची मनोदेवता सांगू लागली. पुन्हा त्याने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्यादा हि त्याला तसेंच स्वप्न पडले. आता मात्र तो स्वस्थ बसू शकला नाही. त्यांत खरोखरच काहीं तरी दैवी शक्ति आहे असे त्याला वाटले. तो उठला. चूळ भरली आणि कोणाच्याहि न कळत राजवाड्याच्या बाहेर निघुन गेला. माझ्या नोकरपैकी कोणी जर मला पाहिले तर काय म्हणतील? असा विचार करीत तो तबेल्यात गेला.

राजेने आपला घोडा काढला आणि जंगलाच्या बाजूला निघून गेला. सुदैवाने त्याला कोणी पाहिले नव्हते म्हणून बरें. चोरीच करावयास निघालेला तो चोराप्रमाणे आपले तोंड झांकून घेतले त्याने. चोराविषयीं त्याच्या मनात विचार घोळू लागले. चोरी करणे हे सुद्धा एक कौशल आहे. किती विचार करून पावले टाकावी लागतात. त्यांना धैर्य आणि साहस कमालीचे असले पाहिजे. पुढील परिणामाला तयार राहिले पाहिजे. समजा लोकांच्या हाती सांपडलो तर त्यांचा मार खाण्याची तयारी पाहिजे. फाशीची शिक्षा जरी झाली तरी त्याला सिद्ध झाले पाहिजे.

नाना त-हेचे विचार येऊन त्याचे मन राजा असून सुद्धा करू लागले. त्याला वाटले जर आपण चोरी केली आणि सांपडलो तर मार खावा लागेल. कदाचित आपण कोण हे कळण्यापूर्वीच आपल्याला मारून टाकले तर...! आणि चोर म्हणून आपल्याला कोणी पकडले आणि राजा असल्याचे त्याला कळले तर लोकांत किती अपमान होईल ? छे...! छे...! आपल्या ऐकट्याच्याने हे काम होणार नाही. कोणा तरी चोराला गांठून त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे. राजाच्या मनात विचार येत होते आणि तो जंगलांतून पुढे पुढे चालला होता.

तेव्हांच काळ्या घोड्यावर स्वार होऊन येत असलेली एक व्यक्ति त्याला दिसली. इतक्या रात्रीचा कुठे निघालास....!

“काय नांव तुझें?" राजाने विचारले.

पण तो मनुष्य काही बोलला नाही. राजाने लागलीच आपली तलवार उपसली आणि हो तयार म्हणून त्याला सावध केलें. दोघांचें इंद्र सुरू झाले पहिल्याने त्यांनी घोड्यावरूनच युद्ध केले. पण मग खाली उतरून त्यांना युद्ध करावे लागले. थोड्याच वेळांत तो मनुष्य पडला.

तो राजास म्हणाला-“तुझ्यासारखा योद्धा मी अद्याप पाहिला नाही. तुझें युद्ध कौशल्य अचाट आहे. तूं पाहिजे तर मला मारून टाक."

“तुला मारण्यांत माझा काहीहि फायदा नाही. तूंहि एक उत्तम योद्धा असावास असें वाटते. तुझ्यामुळे झाले तर माझे हितच होईल. काय तुझें नांव?"

"माझें नांव सहदेव." त्याने सांगितले.

"तर मग तूं हि चोर आहेस? बरें झालें. चल आपण दोघे जण मिळून कोठेतरी जाऊन चोरी करूं. आपण राजवाड्यांत जाऊन चोरी करूं या का?" राजाने विचारले.

"नाही. चांगल्या माणसांना मी कधी त्रास देत नाही. महाराजांना मी काही हि त्रास देणार नाही, शूरसेनाच्या घरी जाऊं पाहिजे तर.” सहदेव म्हणाला.

शूरसेन चांगल्या दरबाऱ्यापैकी एक होता आणि शिवाय राजाचा मेहुणा होता.

"राजाविषयीं तुझ्या मनांत फार आदर आहे अं? मग त्याच्या बहिणीच्या घरांवर डाका घालावा म्हणून कसे वाटले तुला?" राजाने विचारले.

"शूरसेनाच्या राज भक्ति पेक्षा माझी राज भक्ति निराळी आहे. मी वेळ पडल्यास राजासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार आहे. मी असें ऐकले आहे की शूरसेनाच्या वागण्यामुळे राजाच्या बहिणीला कांहीं सुख नाही.” सहदेव म्हणाला.

हे ऐकतांच राजाला धक्का बसला. वाईट हि वाटले. तो समजत होता की शूरसेन आपल्या बायकोवर फार प्रेम करीत आहे.

“चल. आज त्याच्याकडे जाऊन चोरी करूं या.” राजा म्हणाला.

दोघे हि घोड्यावर बसून शूरसेनाच्या किल्ल्यांत शिरले. सहदेव चांगला कसलेला चोर असल्यामुळे पाहारेकऱ्याचे डोळे चुकवून तो किल्ल्यांत शिरला. राजा त्याच्या या चातुर्यावर फार खूश झाला.

तो मनांत म्हणाला, “जर का मी एकटाच असतो तर नकी पाहारेक-यांनी मला पकडले असते."

राजाला पाठीमागे घुटमळतांना पाहून सहदेवाने ओळखले की आपला साथीदार अगदी नवा आहे. त्याने राजाला काळोखांत उभे केले.

सहदेव म्हणाला, "मी जाऊन चोरी करून येतो. तो पर्यंत येथून कोठे जाऊ नकोस."

थोड्या वेळाने तो पैसे व दागिने एका गाठोड्यांत बांधून घेऊन आला. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले.

“आपण येथून लवकर निघून गेलों नाही तर कदाचित पकडले जाऊं." राजा म्हणाला.

"थांब! अशी घाई करूं नकोस अजून एक चोरी करावयाची आहे. वरच्या मजल्यावर त्याच्या निजावयाच्या खोलीत शूरसेनाचे रत्नजडित सोन्याचे खोगीर आहे. ते आणले पाहिजे." सहदेव एवढे सांगून झटकन तेथून निघून गेला.

तो सरळ दुसऱ्या मजल्यावर गेला. तेथे तो व त्याची बायको पलंगावर निजली होती. सहदेवानें खोगीर हळूच उचलले आणि जाऊं लागला. पण तेवढ्यांत कसला तरी आवाज झाला. तो ऐकून शूरसेन उठला.

खडबडून जागा झालेला शूरसेन, "कोण आहे? तलवार कुठे आहे माझी" असे म्हणून ओरडला.

"काय झाले..! कां ओरडलांत?" म्हणून त्याची बायको खडबडून जागी होऊन म्हणाली. "कोणी आल्याची चाहूल वाटली, आंत कोणी तरी आल्यासारखे वाटले."

"काही नाही हो. झाडाच्या फांद्या वाऱ्याने हलल्या असतील झालं. रोजच तुम्ही काही तरी स्वप्न पाहून उठतां. मनांत काही तरी असल्या शिवाय रोज असे तुम्ही उठणार नाही.” बायको म्हणाली.

"अशी घाई करूं नकोस. उद्या माझी सर्व काळजी दूर होईल. उद्या संध्याकाळपर्यंत अर्धे राज्य माझ्या ताब्यात येणार आहे." शूरसेन मोठ्याने हसून म्हणाला.

"उद्या मी दरबारांत जाणार आहे. म्हणून म्हणालांत. परंतु राजा अर्धे राज्य देणार आहे का म्हणून ते सांगितले नाहीत?" बायको म्हणाली.

“देणार कोण??? हा.. हा.. हा..! मी आणि माझे काही साथीदार तुझ्या भावाच्या राजवाड्यात जाऊन राजाला मारून टाकू शकतो.”

"त्याचे राज्य वाटून घेणार.” असे सांगून शूरसेनाने त्या कारस्थानांत कोण कोण आहेत त्यांची नावे सांगितली.

"भलतंच...! मी आपल्या भावाची हत्या होऊ देणार नाही.” असें म्हणत ती उठू लागली.

परंतु शूरसेनाने तिला अगदी बेदम मारले. थोड्या वेळाने पुन्हां दोघे शांतपणे झोपली. सहदेव राजाकडे आला आणि सर्व ऐकलेला प्रकार सांगितला.

सहदेव राजाला म्हणाला, "दे माझी तलवार. त्या राजद्रोहाला मारून जर मी परत आलों नाही तर मी मेलों असें समज व तूं निघून जा.”

खरे म्हणजे सहदेवाच्या बोलण्यावर राजाचा विश्वास बसला नाही. कारण शूरसेनावर त्याचा फार विश्वास होता.

राजा म्हणाला, "अरे, पण तुला काय करायचे आहे मध्ये पडून ? राजासाठी प्राण द्यायला तूं एवढा जिवावर उदार का बरें होतोस. सांग..! काय केलें आहे राजाने तुझ्यासाठी..?"

"तूं मला प्राणदान दिलेस म्हणून, नाहीं तर तुलाच प्रथम मारले असते. आण माझी तलवार मला जाऊन त्या दुष्टाचा नाश करून येऊ दे." सहदेव म्हणाला.

“नको. आपण जाऊन राजालाच सांगू या मग तो पाहील त्याला काय करावयाचे ते." राजा म्हणाला.

“माझ्या म्हणण्यावर राजा विश्वास करणार नाही. कारण मी चोर आहे व मला हद्दपार केले आहे. पाहिल्याबरोबरच माझे डोळे काढून टाकतील ते. मग माझे म्हणणे ऐकणार तरी कोण?" सहदेव म्हणाला.

“पण मला तर हद्दपार केलेले नाही. मी राजाला जाऊन सांगतो." राजा म्हणाला.

नंतर पुन्हां कोठे भेटावयाचे ते ठरवून दोघे आपापल्या मार्गाला लागले. पहाट होण्यापूर्वीच कोणाच्या नकळत राजा आपल्या महालांत पोहोचला. तेव्हांच्या तेव्हा त्याने आपल्या सरदारांना बोलाविलें. अर्थातच त्या कारस्थालांत असलेल्यांना वगळूनच.

तो म्हणाला, " मी सहदेवाला भेटलों होतो. त्यानेच मला ह्या कारस्थानाचा सुगावा लावून दिला. शूरसेन त्यांचा मुख्य आहे."

“आपण शूररसेन व त्याच्या साथीदारांशी लढून त्यांचे पारिपत्य केले पाहिजे." सर्व सरदार म्हणाले.

"पण ते लोक एकदम हल्ला मुळी करणारच नाहीत. एकेक एकेक येतील, मग त्यासाठी एवढी लढाई कशाला. तुम्ही सर्वजण सुसज्ज रहा म्हणजे झाले. एकेकाला एकेक जण पुरे.”

राजाच्या सांगण्याप्रमाणे आलेल्या सर्व कारस्थानी सरदारांना कैद करण्यांत आले. त्यांची शस्त्रास्त्रे काढून घेतली. शेवटी शूरसेन आला. त्याला पकडून राजा समोर आणले. त्याला समजले की त्याचे बाकीचे सर्व साथीदार कैद झाले आहेत.

तरीसुद्धा तो शांतपणे म्हणाला, “हे काय प्रकरण आहे ?

"अहो, मी तुमचा मेहुणा आहे. अशाच तऱ्हेने आपण आपल्या सरदारांचा आदर करता का?"

“राजद्रोह्यांचे स्वागत असेंच करावयाचे असतें.” राजा म्हणाला.

"कोणी हे तुम्हाला सांगितलें ! बोलवा पाहूं त्याला. ऐकू दे तरी?" मेहुणा म्हणाला.

राजाने ठरलेल्या जागी एका माणसाला पाठवून सहदेवाला बोलावणे पाठविलें. सहदेवाला वाटले की आपला साथीदार पकडला गेला आहे आणि आपल्याला पकडण्यासाठी त्याने राजाला आपले नांव सांगितले आहे. परंतु लगेच त्याच्या मनांत आले की काही झाले तरी राजा असा नीच नाही. म्हणून तो त्या माणसाबरोबर राजवाड्यांत गेला.

तो म्हणाला, "महाराज, मी चोर आहे. मला आपण हद्दपार केले आहे. तरी सुद्धा आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून मी येथे आलो आहे. केवळ आपल्या आज्ञेनें."

“काल ज्याला मी प्राणदान दिले त्याला आज मारीन !" राजा म्हणाला.

"काल तुम्ही म्हणजे महाराजच का होते?" त्याने आश्चर्याने विचारलें.

"होय. काल तूं मला चोरी करावयास शिकविलेंस, आज तुझ्याकडून आणखी एका गोष्टीची मदत मागावयाची आहे. तू या राजद्रोह्याशी युद्ध करतोस काय?"

सहदेवानें तें कबूल केले. बराच वेळ दोघांचे द्वंद्वयुद्ध झाल्यावर शेवटी शूरसेन मारला गेला. नंतर राजानें सहदेवावरचे सगळे आरोप दूर केले. शूरसेनाची जहागिरी त्याला दिली आणि पुन्हां त्याला आपला सरदार केले.

राजा आणि चोर

कथाकार
Chapters
राजा आणि चोर