Get it on Google Play
Download on the App Store

आरोपी प्रकरण २

प्रकरण २
दुसऱ्या दिवशी ऑफिस उघडलं तेव्हा दहा नंतर सौम्या चा इंटरकॉम पाणिनी पटवर्धनांच्या केबिन मध्ये वाजला. “बाहेर मिस अलुरकर आली आहे.” सौम्या म्हणाली
“मिस अलुरकर कोण?” पाणिनी ने कपाळावर आठ्या घालत विचारलं.
“सर. मिस अलुरकर म्हणजे काल आपल्याला भेटलेली वेट्रेस, क्षिती अलुरकर. तुमचा अंदाज बरोबर ठरला सर, ती आली आज ऑफिसला.”
“अरे वा ! तिला आत पाठव सौम्या, आणि तू ही ये.”
“मिस्टर पटवर्धन मी खरंच माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, तुमचे कसे आभार मानू मला समजून घेतल्याबद्दल  ! आणि आजची अपॉइंटमेंट दिल्याबद्दल”
पाणिनी हसला, “मला वाटतं किती मी दिलेली टीप पुरेशी होती कालची?”
क्षिती ने आपल्या पर्समधून पाचशेच्या दोन  नोटा बाहेर काढल्या आणि सौम्याला देत म्हणाली. “सरांची कन्सल्टेशन फी म्हणून माझ्याकडून जमा घेऊन टाका. खरंतर ही रक्कम सरांनीच मला काल भेट म्हणून दिली, पण सर माझ्याकडे खरंच आता पैसे नाहीयेत तुमची फी देण्यासाठी. पण सर काल तुम्ही हे सगळं प्रकरण अशा काही चतुराईने हाताळलत  की  आमचे मालक राजेसाहेब यांना जरादेखील संशय आला नाही.”
“क्षिती बस, आणि मला सांग नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे?”
“माझी आत्या मधुरा महाजन.”
“काय सांगायचय तिच्याबद्दल?”
“ती गोड अशी बाई आहे.”
“बऱ्याच बायका गोड असतात.” सौम्या कडे बघत पाणिनी मिस्किलपणे हसत म्हणाला. “पण मला वाटतं क्षिती, की तू वकील म्हणून माझा सल्ला घ्यायला आलीस त्याअर्थी तुला तिच्या गोड पणाच्या आत काहीतरी धोका दिसत असावा.”
“धोका नाही म्हणता येणार, पण काळजी नक्की आहे”
“मला जरा थोडक्यात सांग नेमकं काय आहे ते”
“सर मी बावीस वर्षाची आहे. माझे आई बाबा सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात गेले. ही माझी आत्या आहे. तिला मी यापूर्वी अगदी लहान असताना एकदा पाहिलं होतं.  मला ती खूप आवडली होती त्यावेळेला. त्यामुळे आम्ही अधूनमधून एकमेकांच्या संपर्कात असायचो.”
“तू जेव्हा तुझ्या त्याच्या संपर्कात असायचीस, तेव्हा तू नक्की काय करायचीस?”
“मी तेव्हा शाळेत जात होते. माझ्या वडिलांनी खूप पैसे कमावले. त्यांची वृत्ती अशी होती की ते खूप पैसे कमवायचे आणि ते सगळे खर्चही करायचे. मला लहानपणापासूनच वकील व्हायची इच्छा होती आणि बाबांना सुद्धा तेच हवं होतं की मी कायद्याचं शिक्षण घ्यावं अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत मी लॉ करत होते.त्यांचा मृत्यू हात मला  मोठा धक्का होताच. पण जेव्हा आर्थिक फटका बसला तेव्हा तो फार मोठा धक्का होता.”
“असं वाटत तुझ्या वडिलांनी पुष्कळ पैसा कमावला असावा.”
“सर्वसाधारण व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर पैसा पुष्कळ कमावला पण तो अशा पद्धतीने कमावला की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या पैशाचा ओघ एकदम कमी झाला. म्हणजे जवळजवळ बंद झाला म्हणा ना ! सगळ्यात प्रथम माझ्या लक्षात आलं की त्यांनी आम्ही राहत असलेलं घर गहाण टाकलं होतं. आमच्याकडे असलेल्या गाड्या सुद्धा उधारीवर घेतल्या होत्या आणि घराच्या कर्जाचे बरेच हप्ते थकले होते. माझ्या वडिलांची जगायची हीच पद्धत होती मिस्टर पटवर्धन कमवा आणि खर्च करा उद्याची चिंता करू नका. पुढे पुढे त्यांना अशी सवय लागली की प्रत्यक्ष उत्पन्न मिळायच्या आधीच ते उत्पन्न मिळणार म्हणून ते खर्च करून टाकत.”
“तुझ्या आईने त्यांच्या या वागण्याला कधी हरकत नाही घेतली?”
“ती खूप साधी बाई होती मिस्टर पटवर्धन. पती म्हणजे आपल्यासाठी देव मानणार्‍या ज्या बायका असतात ना, त्या प्रकारची ती बाई होती. बाबांनी घेतलेल्या निर्णयाला तिने नेहमीच डोळे झाकून पाठिंबा दिला. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात कधीही आयुर्विमा घेतला नाही त्याच्यावर त्यांचा विश्वासच नव्हता.”-क्षिती म्हणाली.
“मला असं वाटतंय कि तुला असं पुढे सांगायचं असावं की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझी आत्या मधुरा ने तुला आसरा दिला म्हणजे तुला तिच्याकडे बोलून घेतलं आणि राहण्याच्या दृष्टीने सहारा दिला बरोबर?” पाणिनी ने विचारलं.
“हो बरोबर. आणि माझ्या पुढे देखील त्या वाचून दुसरा पर्याय नव्हता”
“का पर्याय नव्हता? कारण तू नोकरी करायचं ठरवलं असशीलच. तिच्याकडे राहायला जायच्या ऐवजी तू तुझ्याच शहरात राहून तुझ्याच वयाची एखादी रूम पार्टनर मिळवून तुझा चरितार्थ चालूवू शकली असतीस.” पाणिनी म्हणाला.
“वास्तवात ते शक्य झाले नाही मला पटवर्धन, कारण वडिलांच्या हयातीत मी अत्यंत श्रीमंत असं जीवन जगले होते कायम कार ने फिरले होते.मित्रांबरोबर आम्ही कुठेही गेलो तरी सर्व खर्च मीच करत असे. मला कुठलीच आर्थिक विवंचना नव्हती आणि आता अचानक सर्व आर्थिक गणितं बदलली आणि त्याच मित्र-मैत्रिणींबरोबर मला अपमानास्पद रीतीने वावरायला फार अवघडल्यासारखं झालं असतं. दुसरं असं की माझ्याबद्दल लोकांनी सहानुभूती बाळगावी, उगाचच माझं सांत्वन करावं असं मला अजिबात वाटत नव्हतं त्यामुळे आत्या मला तिच्या
 घरी राहायला बोलल्यावर मी तिकडे जायचा निर्णय घेतला. यासाठी मला माझे शहर सोडावं लागलं याही गोष्टीशी मी तडजोड केली.”-क्षिती.
“अगं पण त्यासाठी हॉटेलमध्ये वेटर ची नोकरी का पत्करलीस?” पाणिनी ने विचारलं.
“मला तेवढेच करणं शक्य होतं त्यावेळी. नोकरीची अत्यंत गरज होती, आणखीन मी थांबले असते तर कदाचित मला चांगला जॉब मिळाला असता पण मला दुसऱ्या कुठल्याच नोकरीचा अनुभव नव्हता आणि मी सहज या हॉटेलची जाहिरात आली म्हणून अर्ज केला आणि मला पटकन नोकरी मिळून गेली. माझी आत्यंतिक गरज म्हणून मी ती स्वीकारली मिस्टर पटवर्धन. बरं ते असो, तर मी या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या आत्याकडे राहायला गेले. तिचं दोन मजली एक घर आहे. म्हणजे छोटीशी बंगली. त्यामुळे तिथे अडचणीत राहण्याचा प्रश्न नव्हता.”
“अच्छा मग तू इथे आमच्या या शहरात आलीस तर ! तुझ्या आत्याकडे राहण्याच्या निमित्ताने” पाणिनी म्हणाला
 तिने मान डोलावली.
“जेव्हा तू आत्याकडे राहायला आलीस तेव्हा नोकरी करायचा विचार तुझ्या मनात होता पहिल्यापासून?”
“बिलकुलच नव्हता मिस्टर पटवर्धन. कारण मी अशा समजुतीत होते की माझी आत्या  आर्थिक दृष्ट्या अत्यंत सधन आहे म्हणजे मला ती लहानपणी माहीत होती तेव्हा ती चांगलीच सधन होती पण नंतर लक्षात आलं तिच्याही आयुष्यात नंतरच्या काळात बऱ्याच दुःखद घटना घडल्येत. आणि तिची आर्थिक घडी बिघडली आहे.”
“मला आता या प्रकरणात बराच रस वाटायला लागला आहे सांग पुढे” पाणिनी म्हणाला
“मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी अशी अपेक्षा होती की आत्याकडे राहायला आल्यानंतर ती मला म्हणेल की तुझं लॉ चं शिक्षण चालू ठेव”
“मग? ती नाही म्हणाली?”
“नाही तर म्हणालीच.. शिवाय... मला प्रश्न पडलाय तुम्हाला नेमक्या शब्दात कसं सांगावं हे सर्व”
“तू मला आत्ताच भेटायला आली आहेस ती तुझ्या आत्याच्या संदर्भात?” पाणिनी ने विचारलं
“हो एकाअर्थी तसंच”
“बर मग सांग नेमकं काय हवंय तुला?” - पाणिनी
“एक मोठीच हकीगत आहे सांगायची झाली तर. पण मी तुम्हाला थोडं सारांश रूपाने सांगते. माझी आत्या. ही  माझ्या वडिलांची बहिण, ती एक कर्तुत्ववान स्त्री होती आम्हाला सर्वांनाच असं वाटत होतं की तिचं खूप छान सुरळीत चालले आहे. आणि खरोखर ती होती तशी. माझ्या अंदाजाप्रमाणे तिचं स्वतःचं घर होतं आणि ते तिच्या दृष्टीने पुरेसं होतं दोन वर्षापूर्वी तिच्या आयुष्यात ग्रीष्म महाजन नावाचा एक माणूस आला. एका अर्थाने या सगळ्या प्रकाराकडे बघितलं तर ते एक मोठे स्कॅंडल होतं. या ग्रीष्म महाजन चं शेफाली नावाच्या एका तरुणीबरोबर लग्न झालेले होतं. पण तो तिच्यापासुन विभक्त झाला होता. शेफाली ही अत्यंत नीच आणि उलट्या काळजाची वाईट होती.  तिच्यासाठी मराठीतली कितीही वाईट विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील अशी ती बाई होती. जेव्हा ते दोघे विभक्त झाले तेव्हा त्याने, तिने घटस्फोट द्यावा म्हणून काही पैसे देऊ केले आणि तिला नोएडा ला पाठवून दिलं.  ग्रीष्म  मधुरा आत्याला भेटला. आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. तेव्हा ग्रीष्म ने शेफाली ला घटस्फोटाच्या कागदपत्र विषयी विचारलं पण शेफाली मात्र कायम टाळाटाळ करत राहिली. शेवटी एक दिवस ग्रीष्म महाजन माझ्या आत्या ला घेऊन खूप लांब च्या दौऱ्यावर, बऱ्याच दिवसांसाठी, जवळ जवळ महिनाभर गेला. आल्यावर त्यांनी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींमध्ये जाहीर करून टाकलं की त्याचं आणि मधुरा च लग्न झालंय. आता यातला खरं खोटं पणा मला माहित नाही. त्याच्या मित्राने नातेवाईकांनी मात्र तो सांगतो त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. त्याचा दुसऱ्या एका शहरात ऋतुगंध नावाचा बंगला होता आणि ती एकमेव प्रॉपर्टी अशी  होती जी ग्रीष्म महाजन ने स्वतःच्या नावाने शेवटपर्यंत ठेवली होती. त्याआधी त्याने सगळे पैसे शेफाली ला घटस्फोटाला राजी करण्यासाठी खर्च केले होते. ऋतुगंध बंगल्या जवळच एक  एवायसी क्रिकेट  क्लब  नावाचा क्लब होता. ज्याचा ग्रीष्म महाजन हा सभासद होता. ऋतुगंध बंगल्यावर असताना एक दिवस ग्रीष्म महाजन क्रिकेट खेळायला म्हणून गेला आणि त्या मैदानात मेलेला आढळला. क्लब वाल्यांनी त्याच्या पत्नीला म्हणजे शेफाली ला निरोप दिला आणि तिला बोलावून घेतलं. शेफाली, मी मघाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत पोचलेली स्त्री असल्यामुळे तिने ग्रीष्म च्या प्रेताचा ताबा घेतला. सगळे विधी पार पाडले. ऋतुगंध बंगल्याच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या आणि त्याची उरलीसुरली मिळकत पण हडप केली. मधुरा आत्याला ग्रीष्म महाजन यांच्या मृत्यूची कल्पनाच नव्हती. तिला जेव्हा ते कळलं तेव्हा तिने ऋतु-गंध बंगल्यावर फोन केला तो सोफिया ने घेतला आणि तिने आत्याला स्पष्ट सांगितलं की सर्व मालमत्तेची आता तीच मालकीण आहे आणि मधुराने त्यात अजिबात ढवळाढवळ करू नये.”
“क्षिती, मला सांग, शेवटपर्यंत शेफाली आणि ग्रीष्म महाजन यांचा घटस्फोट झालाच नाही का?”
“सकृत दर्शनी तरी नाही . म्हणजे शेफाली शेवटपर्यंत ग्रीष्म ला सांगत राहिली किती घटस्पोटाच्या कागदपत्राची पूर्तता करते आहे पण प्रत्यक्षात तिने काहीच केलं नाही”
“मालमत्तेच्या वाटणी बाबत काय?” पाणिनीने विचारलं
“मालमत्तेची वाटणी नक्कीच झाली होती, पण ती सगळी तोंडी. लेखी असं काहीच केलं गेले नाही. कागदपत्रावर ग्रीष्म ची विधवा या नात्याने सगळं तिलाच मिळालं”
“प्रत्यक्षात झालं होतं असं की मधुरा आत्याने ग्रीष्म महाजन ला खूप मोठी आर्थिक मदत केली होती. ग्रीष्म महाजन ने ती त्याच्या व्यवसायात किंवा ज्या ज्या ठिकाणी गुंतवली ती सगळी स्वतःच्या नावाने न गुंतवता शेफाली च्या नावाने गुंतवली.
ग्रीष्म महाजन ला संशय होताच की शेफाली ने घटस्फोटाचे कागदपत्र सही केलेले नाहीत आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही त्यामुळे मधुरा आत्या शी लग्न केलं तर ते लग्न बेकायदा ठरेल याची त्याला जाणीव होती आणि तो धोका तो घेऊ इच्छित नव्हता.”
“मधुरा आत्या याबाबत म्हणजे तिचं आणि ग्रीष्म च लग्न झालं आहे किंवा नाही याबाबत नेमके पणाने काही बोलत  नाही का?” पाणिनीने विचारलं
“नाही ना त्याचीच तर मला गंमत वाटते. जेव्हा जेव्हा हा विषय मी आत्याकडे काढते तेव्हा ती खूपच मोघम असं बोलते आत्मविश्वास वाटत नाही तिच्या सांगण्यात”
“अस असेल तर आपल्याला कधी कधी असं दाखवता येईल की मधुरा आत्याने जे ग्रीष्म महाजन ला पैसे दिले,
 ते भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी म्हणून दिले. ते आपल्याला सिद्ध करता आले तर मृत्यूच्या वेळेला ग्रीष्म कडे जी मालमत्ता शिल्लक होती त्यातली निम्मी मालमत्ता तरी तुझ्या आत्याला परत मिळवून देता येईल. क्षिती, तुझ्या आत्याने ग्रीष्म ला दिलेल्या पैशाचा विनियोग नेमका कुठे झाला याची तुला काही कल्पना आहे?” पाणिनी ने विचारलं
“नाही अजिबात नाही मला एवढेच माहिती आहे की मधुरा आत्या नेहमी ग्रीष्म ला असं सांगत आली की पैसा म्हणजे काही सर्वस्व नाही मी तुला अजून आर्थिक मदत करीन. तू शेफाली ला पूर्ण विसरून जा आणि आपण पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू”.
 
“क्षिती, याचाच दुसरा अर्थ असा कि या सगळ्यातच तुझ्या आत्याकडचे सगळे पैसे संपले.?”
“हो. आणि त्यामुळेच मधुरा आत्या मला पुढे कॉलेजमध्ये शिकायला पाठवू शकली नाही. आणि तिची आर्थिक स्थिती बघून मी नोकरी करायला लागले त्यालाही तिने विरोध केला नाही. असाच काही काळ गेला, मी तशीच तिथे राही लागले. पण... आणि खरं सांगू का मिस्टर पटवर्धन मला त्या घरात नाही राहायचं तिच्याबरोबर काही गोष्टी अशा विचित्र घडलेत, मला स्वतंत्र रहायचंय”. क्षिती अचानक उद्गारली.
“ठीक आहे. काय घडलं नेमकं?” पाणिनीने विचारलं
“खूप गूढ अशा गोष्टी. मला त्याची भीती वाटते पटवर्धन. आणि काळजी देखील.”
“म्हणजे ती तुझ्याशी ज्या पद्धतीने वागते त्याबद्दल?”
“त्याबद्दल आणि ती इतरांशी देखील ज्या पद्धतीने व्यवहार करते त्याबद्दल सुद्धा. त्या बंगल्यात माझ्यासाठी एक वेगळी खोली आहे. मधुरा आत्या ने त्या बंगल्याबाहेर असलेल्या बागेची काळजी घेण्यासाठी एक माळी ठेवलाय पण त्याचबरोबर घरातलं काम करण्यासाठी कोणीच नोकर नाही. तीच  सगळं काम करते आणि म्हणते की मला नोकर ठेवणे परवडत नाही.”
“म्हणून तू नोकरी पत्करून तिला मदत करायचं ठरवलंस?” -. -पाणिनी.
क्षिती ने मान डोलावली “तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते पटवर्धन, मधुरा आत्या रोज सकाळचे पेपर इतक्या बारकाईने वाचते की काही विचारू नका.”
“काय वाचते एवढे त्या पेपरमध्ये?”
“कुठल्या दुकानात आणि कुठल्या मॉल मध्ये सेल लागला आहे, आणि कमी किमतीत वस्तू मिळतील हे ती शोधत असते.
कित्येक वेळेला मला घरी पोट भरेल  एवढं सुद्धा अन्न मिळत नाही. मी बावीस वर्षे वयाची आहे.वाढत्या वयाची आहे. मला भूक सहन होत नाही. शेवटी नाईलाजाने मी नोकरी पत्करली आणि तुमच्या मगाच्या प्रश्नाचे उत्तर देते की हॉटेल चीच  नोकरी का पत्करली त्याचं कारण किमान मला तिथे पोटभर खायला तरी मिळेल.”-क्षिती
“तुझा हॉटेलचा मालक म्हणजे मिस्टर राजे तुझ्या कामावर खुश आहे का?” - पाणिनी.
“मला काहीच कल्पना नाही. म्हणजे त्याच्या लेखी मी तिथे नोकरी करते आहे की नाही हे त्याला माहिती असेल कि नाही हे सुद्धा मला सांगता येणार नाही. पण आमचा जो कॅप्टन आहे ना, म्हणजे तो खूप चांगला आहे  मला चांगले सहकार्य करतो. पण तरीही मिस्टर पटवर्धन मला सतत एक भीती वाटत राहते की कधीतरी तो माझ्याशी काहीतरी चाळे करेल आणि मला माझी नोकरी गमवावी लागेल की काय !”
“क्षिती, नोकरी-व्यवसायात हे अशा प्रकारचे प्रसंग घडतातच. प्रत्येकालाच त्याच्यातून सांभाळून राहावं लागतं. पण मला माहितीये की या कारणासाठी तू माझ्याकडे आली नाहीयेस तू नेमकी कशासाठी  आली आहेस?” पाणिनी ने विचारलं.
“अगदी खरं सांगायचं तर तुम्हाला मी जेव्हा त्या आमच्या हॉटेलात पाहिलं त्यावेळेला तिथल्या माझ्या एका सहकाऱ्याने मला सांगितलं की तुम्ही एक नावाजलेले फौजदारी वकील आहात आणि मला एकदम जाणीव झाली की तुम्हाला भेटावं पण त्याच बरोबर मला पण काळजी घ्यायला लागणार होती की माझ्या मालकांना माझा संशय येणार नाही. पण मिस्टर पटवर्धन तुम्ही हे सगळंच इतक्या कौशल्याने हाताळत की माझा मनावरचा ताण हलका झाला.”
“क्षिती, मला अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही, तुला नेमका त्रास काय आहे?”
“मिस्टर पटवर्धन मला एक संशय आहे की माझी आत्या ही एक मोठा फ्रॉड आहे. आणि ती जे आयुष्य जगते आहे, ते खोट आहे”.
“म्हणजे नक्की काय?” - पाणिनी
“म्हणजे एकीकडे ती स्वस्त वस्तू कुठे मिळतील हे पेपर मधल्या जाहिरातीत वाचून त्या दुकानात खरेदीला जाते, वेगवेगळ्या दुकानात आणि मॉलमध्ये फिरते पण त्यात मजा अशी आहे कि जाताना ती टॅक्सीने जाते एका ठिकाणी उतरल्यानंतर ती टॅक्सी तशीच चालू  ठेवते. एका मॉलमधून बाहेर आल्यावर तीच टॅक्सी घेऊन दुसऱ्या दुकानात जाते. पुढच्या खरेदी पर्यंत पुन्हा ती टॅक्सी तशीच ठेवते म्हणजे एकीकडे स्वस्त वस्तू घ्यायचा हव्यास आणि दुसरीकडे टॅक्सीचा खर्च हे दोन परस्परविरोधी नाही का?”
“ही टॅक्सीची एक गोष्ट सोडली तर इतर बाबतीत ती नॉर्मल आहे का?” -. पाणिनी.
“अजिबात नाही” क्षिती म्हणाली. “तिच्या झोपायच्या खोलीत एक मोठं कपाट आहे आणि त्या कपाटात खूप खोके आहेत ती कपाटाचं दार सतत कुलूप लावून बंद ठेवते मला या सगळ्याची भीती वाटते.”   “एकदा मी घरचा केर काढत असताना तिच्या बेडरूम मध्ये गेले एक दिवस ते कपाट उघड होतं”
“म्हणून तो हळूच आत डोकावून पाहिलंस?” -- पाणिनी
“डोकावून वगैरे पाहिलं नाही मिस्टर पटवर्धन मी चक्क आत गेले आणि ते कपाट सताड उघडले. मला असं वाटलं की तिला एवढी खोकी कशासाठी लागत असतील म्हणून, त्यातला एक खोका मी उघडून पाहिला तर तू खोका नोटांनी भरलेला होता !”

(प्रकरण २ समाप्त)