Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय दुसरा

संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥

तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।
तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥

जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३॥

म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु ।
देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥ ५ ॥

श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥ २ ॥

म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥

तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥

तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी ।
तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥

तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥

तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥

हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥

तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥

विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥

ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥

की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥

सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥

म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥

सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥ १८ ॥

हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।
सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥

हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥

म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं ।
हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत ।
तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥

आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले ।
हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा ॥ २६ ॥

मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।
हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥

देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥

हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥ ३१ ॥

देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला हातीं ॥ ३२ ॥

देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥ ३३ ॥

तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमांचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे ॥ ३४ ॥

जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शको धरूं ।
तया प्रत्यक्ष केवीं । घातु देवा ॥ ३५ ॥

वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले ।
जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥

मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ३७ ॥

जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥

गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥

देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥

हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥ ४० ॥

वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे ।
परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥

स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।
परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥

हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥

हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु ।
आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥

ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥ ४५ ॥

हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥

ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥

देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥

ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती ।
मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥

ऐसे अर्जुन तिये अवससरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥

हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना ॥ ५१ ॥

न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥

येर्‍हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।
परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥

पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥

आतां ऐसेयांतें वधावे । कीं अव्हेरुनिया निघावें ।
या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥

कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥

आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझे ॥ ५५ ॥

तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे ।
मग पांसीच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥

देवा मज तैसे जाहले । जें मन भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणे ॥ ५७ ॥

तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसी तूं ॥ ५८ ॥

तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥

जैसा शिष्यांते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।
कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं ॥ ६०॥

नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये ।
तरी ते कैसेनिं जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥

तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥

तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥

न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥

हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥ ६४ ॥

एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।
परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्‍ही पेरिलीं ।
तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥

ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें काही नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥

तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥

ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥ ६९ ॥

कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥

सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥ ७१ ॥

हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी ।
तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥

तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥

मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥

तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥

म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥

तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥

आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥

ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥

संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः ।
न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥

ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥ ८१ ॥

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।
मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥ ८२ ॥

ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरोनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते ॥ ८३ ॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥

मग आपुला चित्तीं म्हणे । एथ हें काय आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांही नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥

हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी ।
जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥

ना तरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधी ।
वैद्य सूचि निरवधि । निदानींची ॥ ८६ ॥

तैसा विवरितु असे श्रीअनंतु । तया दोन्हीं सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ॥ ८७ ॥

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिले ।
जैसें मातेच्या कोपीं थोकलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥

कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥

तैसे वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥


श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥ ११ ॥

मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥

तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणीवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥

जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥

तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥

तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना ।
हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ॥ ९५ ॥

एथ समर्थु एक आथीं । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वायाचि काय बोलती । जगामाजीं ॥ ९६ ॥

हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले ।
आणि नाशु पाविले । तुझेनि कायी ॥ ९७ ॥

तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसी घातु न करिसी चितीं ।
तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥

कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवो देसी ॥ ९९ ॥

अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥ १०० ॥

परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावें तें चिंतसी ।
आणि तूंचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥ १०१ ॥

देखें जे विवेकी जे होती । ते दोहींतेही न शोचती ।
जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ॥ १०२ ॥


न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥

अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥

नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाऊनि ।
हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥

हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।
येर्‍हवीं तत्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥ १०५ ॥

जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥

तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आता काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥

देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥

आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥

एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥

तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होति जाति पाहीं ।
ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥

एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियांआधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।
ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥ ११३ ॥

देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ ११५ ॥

भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥ ११६ ॥

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगे विषादु - । तोषु देता ॥ ११७ ॥

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।
म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।
आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥

हे विषय जयाते नाकळिती । तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥

तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥

नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥

आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक ।
जें विचारें परलोक । वोळखिती ॥ १२५ ॥

या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥

सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे ।
परीं निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥

कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥

ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।
मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥

कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आले ॥ १३० ॥

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी ॥ १३१ ॥

म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमैदं तत् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ॥ १७ ॥

देखें सारासार विचारितां । भ्रांति जे पाहीं असारता ।
तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥

हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही ॥ १३४ ॥

जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ॥ १३५ ॥

अन्तवंतः इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्याद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥

आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥

तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें ।
मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ॥ १३७ ॥

तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥

न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥

जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥

तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां ।
शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥ १४० ॥

कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥

ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरले असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि ॥ १४२ ॥

तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।
म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा ॥ १४३॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥ २२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥

नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥

हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥

हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥

अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १४७ ॥

हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी ।
ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥

हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना।
निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥

हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु ।
अनादि अविकृतु । सर्वरूप ॥ १५० ॥

अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा ।
मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥

अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥

अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी ।
तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥

जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥

तें आदि नाहीं खंडले । समुद्रीं तरी असे मिनलें ।
आणि जातचि मध्यें उरले । दिसे जैसें ॥ १५४॥

इये तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥

म्हणोनि हे आघवें । एथ तुज न लगे शोचावें ।
जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥

ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥

तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं ।
जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥

जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥

महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे ।
म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥

तूं जरी हे ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी ।
काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥

एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां ।
दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥

अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥

जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते ।
मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥

तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती ।
देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥

येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें ।
तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥ १६६ ॥

ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।
का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकीं ॥ १६७ ॥

तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥

तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी ।
तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥

जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत ।
जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥

दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्वर तयातें आचरताती ॥ १७१ ॥

आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥

एक अंतरी निश्चळ । जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥

एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता ।
निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥

एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले ।
एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥ १७४ ॥

जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत ।
परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥

तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती ।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥

याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥

एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥

स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥

तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥

या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांही पातलें ।
कीं युगचि हें बुडालें । जर्‍हीं एथ ॥ १८१ ॥

तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणें ॥ १८२ ॥

अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।
तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥

अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितलें ।
ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥

तैसे आनीं आन करितां । नाशु होईल हिता ।
म्हणऊनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥

वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरिता बाधु नाहीं । कवणे काळीं ॥ १८६ ॥

जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥

म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही ।
संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥

निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें ।
हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥

अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।
कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे ॥ १९१ ॥

हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।
मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥ १९२ ॥

ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें ।
हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥ १९३ ॥

क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ॥ १९४ ॥

ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥

अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं ॥ ३३ ॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥

पूर्वजांचे जोडलें । आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥ १९७ ॥

असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥

जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥

ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे ।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी ॥ २०० ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥

म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी ॥ २०१ ॥

जाणतेनि तंवचि जियावे । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां ॥ २०२ ॥

तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता ।
परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥

हें चहूंकडून वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥ २०४ ॥

ऐसेनिही प्राण्संकटे । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥

भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥

तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी ।
आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥

तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां
कां प्रत्यया येईल मना । सांगे मज ॥ २०६ ॥

अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः ।
निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥

हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगें बोलु उरला । निका कायी ॥ २०८ ॥

लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुली जीवितें ।
परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥

ते तुज अनायसें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥

तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११॥

दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥

ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट ।
जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥ २१३ ॥

ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥

जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा॥ २१५ ॥

जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें ।
तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा ॥ २१६ ॥

ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥ २१७ ॥

आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥

मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे ।
हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥

म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरिटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥ २२१ ॥

देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥

सांगे प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालो नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥

अमृतें तरीचि मरीजे । जरी विखेंसी सेवीजे ।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे ॥ २२४ ॥

म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा ।
क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाही ॥ २२५ ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥

सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥

एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥

आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जे पावें तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥

ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥

एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥ ३९ ॥

हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥

जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥ २३१ ॥

जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ॥ २३२ ॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥

तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥

कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥

तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि ।
हां असतांचि उपाधि । आंकळू न सके ॥ २३५ ॥

जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥

अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥ ४१ ॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥

पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरी ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥

आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥

तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥

तैसी ईश्वरावांचूनि कांही । जिये आणिक लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥

येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥

म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥

यामिनां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥

म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥

एथ हें वांचूनि कांही । आणिक सर्वथा सुखचि नाही ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥

देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥

क्रियाविशेषें बहुतें । न लोपितीं विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥

परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे ।
कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥

दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥

सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ २५३ ॥

जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी ।
तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥

म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥

तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत ।
म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥ २५६ ॥

येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥

म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।
एथ झणे अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥

तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥ २५९ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥

जरी वेदें बहुत बोललें । विविध भेद सूचिले ।
तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥ २६० ॥

जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥ २६१ ॥

का उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ ।
तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥ २६२ ॥

तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥

म्हणौनि आइकें पार्था । याचिवरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥

आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।
जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥

परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥

योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ॥ २६७ ॥

परी आदरिले कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥ २६८ ॥

कां निमित्तें कोणे एकें । तें सिद्धी न वचतां ठाकें ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥

आचरता सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥

देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।
तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे ॥ २७१ ॥

देखें संतासंती कर्मीं । हें जे सरिसेपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥

दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥ ५० ॥

अर्जुना समत्व चित्ताचें । तेचिं सार जाण योगाचें ।
जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥

तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडे पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥

परि तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥ २७५ ॥

म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।
मनिं करी अव्हेरु । फळहेतूचा ॥ २७६ ॥

जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभय संबंधी सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१ ॥

ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥

मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति ।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥

तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥ २८० ॥

मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।
तेणे निचाडें होईल मन । अपैसें तुझे ॥ २८१ ॥

तेथ आणिक कांही जाणावे । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुनां आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥

इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥

समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥

अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥ ५४ ॥

तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥ २८५ ॥

मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥

या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥

आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित ॥ २८८ ॥

तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे ।
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥

तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥

श्रीभगवानुवाच: प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥

म्हणे अर्जुना परियेसीं । हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेसीं । करीत असे ॥ २९१ ॥

जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु ।
परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥ २९२ ॥

तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥ २९३ ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥ ५६ ॥

नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥

अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥ २९५ ॥

ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥

जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा ।
अधमोत्तम प्रकाशा - । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥

ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥ २९८ ॥

गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे ।
जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥

ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो पां जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥

कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥

तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥ ३०२ ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥

आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांते साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥

श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥

जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥

तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके ।
तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥

येरां इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥

मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाईजे ॥ ३०८ ॥

तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥ ३०९ ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥

येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।
जे रहाटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥

जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥

तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥

देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें ।
मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥

तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये ।
ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥ ३१४ ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥

म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥ ३१५ ॥

तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥ ३१६ ॥

जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥

एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही ।
तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥

जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥

तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते ।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥ ६२ ॥

क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥

जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणे ॥ ३२२ ॥

संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥

कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥

नग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥

जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥ ३२६ ॥

ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥

चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी ।
पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥ ३२८ ॥

म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना ।
मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥

तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणे हें पतन । गिंवसीत पावे ॥ ३३० ॥

रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥

म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥

पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष ।
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥ ३३२ ॥

जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥ ३३३ ॥

तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥

तरी विषयांतुही कांही । आपणपेवाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा ॥ ३३५ ॥

जरी उदकें उदकीं बुडीजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरीं विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥

ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ ।
तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥

देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथे रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥

तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥

जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥ ६६ ॥

ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं ।
तो आकळिलां जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥

तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥

निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना ।
तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥

आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥

देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तरी अशांत सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥

म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥

ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥

तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिकें ॥ ३५० ॥

तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥

म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया ।
तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ॥ ३५१ ॥

देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥

तैसीं इंद्रिये आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥ ३५४ ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९ ॥

देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो ॥ ३५५ ॥

तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ ७० ॥

पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥

जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥३५८ ॥

ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाति समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥

तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥

सांगे सूर्याचां घरी । प्रकाशु काय वातीवेरी ।
की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥

देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥

जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥

जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥

पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही ।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥ ७१ ॥

ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥

तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि ।
विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजीं ॥ ३६७ ॥

एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२ ॥

हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातलें परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥

जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता ।
आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥

तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥

ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुने मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥

जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥ ३७२ ॥

ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला ।
आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ॥ ३७३ ॥

तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥

जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु ।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥ ३७५ ॥

दुसरा अध्याय समाप्त ||