Get it on Google Play
Download on the App Store

अयोध्याकांड - भाग ४

कैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती! कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले! कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच! तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –
१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.
२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे?
३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.
४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.
५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.
६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं?

कैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही?’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही! त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका!’
दशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.