Get it on Google Play
Download on the App Store

अरण्यकांड - भाग ५

शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे तीन वीर व जनस्थानातील त्यांची मोठी सेना चालून आली. त्या सैन्यात हे तीन वीरच धनुष्य-बाणाने लढणारे होते, इतर सर्व हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्राने लढणारे होते. हे जनस्थान पंचवटीच्या जवळपासच होते व स्थानिक नरभक्षक लोकांच्या सहायाने येथे रावणाने आपले ठाणे वसवले होते असे म्हणावे लागते. अद्याप त्यांचा आर्यावर्तातील कोणा राजाशी संघर्ष झालेला वर्णिलेला नाही. पण संभाव्य संघर्षाची ही रावणाची पूर्वतयारी दिसते.
लक्ष्मणाला सीतेच्या संरक्षणासाठी ठेवून रामाने एकट्यानेच त्याना तोंड दिले. युद्धाचे खुलासेवार वर्णन वाचावयास मिळते. सर्व सैन्य मारले जाऊन एकटा खर उरला व तोही अखेर मारला गेला. रामाने एकहि ’अस्त्र’ वापरल्याचा उल्लेख नाही. फक्त धनुष्यबाण वापरून कितीहि पराक्रमी धनुर्धर असला तरी किती सैन्य मारू शकेल? महाभारतात सर्व धनुर्धर मोठ्या सैन्याविरुद्ध अस्त्रांचा सर्रास वापर करतात. तेव्हा खराचे सैन्य १४,००० होते ही अतिशयोक्ति म्हटली पाहिजे. युद्ध संपल्यावर लक्ष्मण व सीता गुहेतून बाहेर आलीं व रामाला फारशा जखमा झालेल्या नाहीत असे पाहून आनंदित झालीं.
खराचा ससैन्य नाश झाल्याचे वृत्त अकंपन नावाच्या वांचलेल्या सैनिकाने रावणाला सांगितले. रामाच्या बळाचे व युद्धकौशल्याचे त्याने वर्णन केले. ’रामाला युद्धात हरवणे सोपे नाही तेव्हा सीतेला पळवून आणलीस तर राम विरहानेच मरेल’ असे त्याने रावणाला सुचवले. हा सीताहरणाबाबत पहिला उल्लेख आहे. हा रावणाचा स्वत:चा मूळ बेत नाही. मात्र रावणाला हा सल्ला पटला व तो एकटाच निघाला व मारीचाच्या आश्रमात जाऊन त्याला भेटला. जनस्थानातून रावणाचे ठाणे उठल्यामुळे काहीतरी केले पाहिजे असे त्याला जाणवले. ही रावण-मारीच यांची पहिली भेट. तिच्याबद्दल आपण वाचलेले नसते! मारीच हा ताटकेचा पुत्र असल्यामुळे मदत करील अशी रावणाची साहजिकच अपेक्षा होती. हा मारीचाचा आश्रम कोठे होता याचा काही खुलासा नाही.
मात्र यावेळी मारीचाने रावणाला म्हटले, ’सीतेच्या हरणाचा सल्ला तुला देणारा तुझा शत्रूच म्हटला पाहिजे. रामाच्या तूं वाटेस जाऊं नको ते तुला झेपणार नाहीं. तूं लंकेत सुखाने राज्य कर व रामाला पंचवटीत सुखाने राहूंदे!’ नवल म्हणजे रावणाने हा सल्ला मानला व तो लंकेला परत गेला!