Get it on Google Play
Download on the App Store

अरण्यकांड - भाग ८

मारीचाने मरताना मारलेल्या आर्त हाका लक्ष्मण व सीता यांना ऐकूं आल्या त्याअर्थी मारीच व राम फार दूर गेलेले नव्हते. मारीच मेल्यावर रामाला शंका आली व म्हणून तो घाईघाईने परत फिरला. हाका ऐकू आल्यावर लक्ष्मण व सीता यांच्यात बराच वादविवाद झाला व अखेर नाइलाजाने लक्ष्मण निघाला यांत काही काळ गेलाच. लक्ष्मणाला राम वाटेतच भेटला व दोघे घाईने परतले. लक्ष्मण निघून परत येईपर्यंत थोडाच वेळ गेला असणार. परत येतात तोंवर रावणाने सीतेला नेलीच होती.
लक्ष्मण कुटी सोडून गेलेला पाहिल्यावर रावण कुटीपाशी आला. सीतेने त्याचे स्वागत केले. रामायण म्हणते दोघांमध्ये लांबलचक संभाषण झाले. रावणाने प्रथम ब्राह्मणवेषाला साजेसे वेदमंत्र म्हतले. मग तिच्या सौंदर्याचे वर्णन करून तूं कोण व या धोकादायक वनात काय करीत अहेस असे विचारले. सीतेने आपला इतिहास विस्ताराने सांगितला. मग रावणाने स्वत:ची ओळख विस्ताराने सांगून तिला वश होण्यास विनविले. सीतेने त्याला झिडकारल्यावर अखेर त्याने तिला पकडले व उचलून घेऊन तो निघाला. हे सर्व होईपर्यंत राम-लक्ष्मण परत कसे आले नाहीत? याचा अर्थ असा घ्यावा लागतो कीं लक्ष्मण बाहेर पडलेला दिसल्याबरोबर अजिबात वेळ फुकट न घालवतां रावणाने सरळ सीतेला उचलले! संभाषणात वेळ घालवला नाही. सीता वश होईल अशी भाबडी कल्पना तो कशाला बाळगील?
रामायण म्हणते , सीतेने या प्रसंगी रावणाला आपली माहिती विस्ताराने सांगितली. तिने म्हटले, ’आमचा विवाह झाल्यावर आम्ही बारा वर्षे अयोध्येत सुखात राहिलो. मग कैकेयीच्या मागणीमुळे आम्हाला वनात यावे लागले, यावेळी रामाचे वय २५ व माझे १८ होते.’ तर मग म्हणावे लागते विवाहाचे वेळी राम १३ वर्षांचा व सीता ६ वर्षांची होती. हे अतिशयोक्त वाटते. रामाची मागणी विश्वामित्राने केली तेव्हां ’राम फक्त सोळा वर्षांचा आहे’ असे दशरथ म्हणाला होता. दुसरें म्हणजे विवाहानंतर बारा वर्षे अयोध्येत गेलीं तर एवढा दीर्घ काळ भरत-शत्रुघ्न कैकय देशालाच होते काय़? ते परत आल्याचा मुळीच उल्लेख नाही! यांत थोडीफार विसंगति आहे. रामायण एकहातीं वाल्मिकीचे मग त्याने अशी विसंगति कां येऊं दिली असेल? मारीच रावणाला म्हणाला होता कीं ताटकावधाचे वेळीं राम फक्त बारा वर्षांचा होता तरी त्यावे बाण मला सोसवले नाहींत. रामाला अवतारस्वरूप मिळाल्यावर त्याचे माहात्म्य वाढवण्याचा हा प्रकार वाटतो.