Get it on Google Play
Download on the App Store

द्रौपदी स्वयंवर

आतां द्रौपदीच्या स्वयंवराची कथा विस्ताराने पाहूं. अध्याय १८५-श्लोक ८-१० मध्ये म्हटले आहे कीं द्रुपदाची खरी इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी ही होती. अर्जुनाला हरवतां येत नाही व त्याशिवाय द्रोणाचा पराभव शक्य नाही या पेचातून सुटका होण्यासाठी अर्जुनाला जामात करून घेणे हा एकच मार्ग होता. पण अडचण ही होती कीं पांडव तर लाक्षागृहात जळून मेले असे जाहीर झाले होते. पण तरीहि जर पांडव जिवंत असलेच तर अवघड पणाचे आव्हान स्वीकारून अर्जुन पुढे येईलच आणि तो जिवंत नसलाच तर मग जो कोणी वीर पण जिंकेल तो महावीरच असेल व द्रोणाविरुद्ध तो उपयोगी पडेलच या विचाराने मत्स्यवेधाचा पण लावलेला होता. स्वयंवराला आलेले लोक १५ दिवस मंडपाची शोभा पाहत होते व मत्स्ययंत्रहि निरखत होते. सोळाव्या दिवशी सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने केलेल्या घोषणेत, पण जिंकण्याबरोबरच थोर कुळात जन्म, देखणा व बलवान असणे याही अटी स्पष्ट सांगितल्या. द्रौपदीने कर्णाला नाकारले ते अनपेक्षित खासच नव्हते. कर्णानेच हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते!
अध्याय १८७ मध्ये ब्राह्मण समुदायात त्याच वेषात बसलेल्या पांडवाना कृष्णाने ओळखले व बलरामाला खुणेने दाखवले असे म्हटले आहे. पांडव लाक्षागृहातून वाचले असावेत अशी कृष्णाला आशा वा माहिती असावी म्हणून इतर कोणाचे नाही पण त्याचे पांडवांकडे लक्ष गेले असावे. खरे तर या प्रसंगापूर्वी पांडव व कृष्ण यांच्या भेटीचा एकहि उल्लेख महाभारतात नाही. कृष्ण कंसवधापर्यंत गोकुळात दडून होता. नंतर दीर्घकाळ जरासंधाशी युद्ध, द्वारकेला स्थलांतर, रुक्मिणीस्वयंवर, या घटनांत व्यग्र होता. पांडवांची भेट होण्याची वेळच आली नव्हती. तेव्हां तर्कानेच ओळखले असावे.
पणाचे धनुष्य सज्ज करतानाच जरासंधासारख्याचेहि बळ पुरले नाही याचा अर्थ बळापेक्षा हा कौशल्याचा प्रश्न होता. कर्ण ते करू शकला पण तो पडला सूतपुत्र! द्रौपदीने स्वत:च सांगून टाकले कीं मी सूतपुत्राला वरणार नाही. कर्णानंतर कृष्ण, यादव, कौरव वा इतर कोणा क्षत्रियवीराने प्रयत्नहि केला नाही. अखेर ब्राह्मणवेषातील अर्जुनाने पण जिंकल्यावर द्रुपद हर्षभरित झाला. हा अर्जुनच अशी त्याची खात्री झाली. कृष्णाच्या कानावर आलेली बातमी द्रुपद व धृष्टद्युम्न यानाही माहीत होती. अध्याय १९३ श्लोक ९-१३३ मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्द कौरवांकडे मात्र विदुर सोडून इतर कोणाला, भीष्मालाहि, पांडव जिवंत असल्याची शंका नव्हती.
एका ब्राह्मणकुमाराने पण जिंकल्यामुळे मंडपात कोलाहल झाला. पांडवांना अजूनहि कोणी ओळखले नव्हते. तेव्हाच, युधिष्टिर, नकुल व सहदेव, राजेलोकांच्या क्षोभाला तोंड देण्याचे काम भीमार्जुनांवर सोडून देऊन, त्वरेने (महाभारतांतील शब्दप्रयोग) मुक्कामाचे ठिकाणी निघून गेले. ही त्वरा कोणती होती? राजेलोकांच्या युद्धेच्छेला भीमार्जुनानी तोंड दिले. भीमाने एक झाडच उपटून सर्वांना झोडपले. अखेर कृष्णाने सर्वांना समजावले की या ब्राह्मणाने धर्मानेच पण जिंकला आहे तेव्हा युद्ध पुरे करा. युद्ध थांबले. भीम, अर्जुन व पाठोपाठ द्रौपदीहि मुक्कामाचे ठिकाणी परतलीं. युधिष्ठिर आधीच परतला होता व अर्जुनाने पण जिंकला आहे व भीमार्जुनांबरोबर द्रौपदीहि येणार आहे हे कुंतीला कळलेच होते. मध्ये भरपूर वेळहि गेला होता. यापुढचा परिचित नाट्यप्रसंग हा एक बनाव होता व त्यामागचा हेतु वेगळाच होता. पुढील भागात त्याची सविस्तर तपासणी करू!