Get it on Google Play
Download on the App Store

हा सूर्य व हा जयद्रथ

जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो!
महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.