Get it on Google Play
Download on the App Store

नरो वा कुंजरो वा

हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!