Get it on Google Play
Download on the App Store

भाग ६

महाभारत म्हणते कीं तेराव्या दिवशी त्रिगर्त वीरानी अर्जुनाला दिवसभर अडवून ठेवले. नवल म्हणजे या सर्व दिवसभराच्या अर्जुन-त्रिगर्त युद्धाचे वर्णन अवघ्या चार श्लोकात उरकले आहे! आधीच्या दिवसाच्या युद्धाचे वर्णन अनेक पाने भरुन आहे! मला दाट शंका आहे कीं या दिवशी अर्जुन थकव्यामुले वा जखमांमुळे दिवसभर युद्धभूमीवर फिरकला नसावा!
या दिवशी द्रोणाने दुर्योधनाला आश्वासन दिले होते कीं आज मी एका तरी पांडवपक्षाच्या प्रमुख वीराचा अंत घडवीन. मात्र त्याने कौरवसेनेचा चक्रव्यूह रचला होता. त्याचे वर्णन भेदण्यास अत्यंत कठीण असे केले आहे हे वर्णन खरे तर बचावात्मक व्यूहाला लागू पडते. द्रोणाने स्वतःला या व्यूहापासून वेगळे ठेवले होते. त्याचा बेत युधिष्ठिराला पकडण्याचाच होता. हे अर्थातच पांडवाना ठाऊक होते. या दिवशी पांडवानी अनपेक्षितपणे सुरवातीलाच द्रोणावर हल्ला केला. द्रोणाने आपला बचाव व्यवस्थित केला. चक्रव्यूह कोण भेदणार याचे उत्तर पांडवाना मिळत नव्हते.
अभिमन्युवधाबद्दल मी इतरत्र विस्ताराने लिहिले आहे त्यामुळे सर्व वर्णन करत नाही. अर्जुनाच्या अनुपस्थितीत ते काम अभिमन्यूवर पडले. तो व्यूह तोडून आत शिरला व सर्व कौरववीराना भारी पडत होता. अखेर द्रोणानेच सल्ला दिला कीं त्याच्या हातात धनुष्य आहे तोवर तो हरणार नाही. काही करून ते तोडा. त्याप्रमाणे करून अखेर कौरवानी अभिमन्यूचा वध केला. द्रोणाला याचा आनंद झाला का? महाभारत काहीच म्हणत नाही!
अर्जुन नसूनहि दिवसअखेरपर्यंत द्रोण युधिष्ठिराला पकडू शकला नाहीच! अभिमन्यु मारला गेला आणि या दिवसाचे युद्ध संपले. अर्जुनाला अभिमन्यु मारला गेल्याचे कळले तेव्हां त्याने दुसरे दिवशी जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. कौरवाना हे कळल्यावर त्यानी कोणत्याही परिस्थितीत जयद्रथाला वाचवायचे म्हणजे अर्जुन स्वतःच प्रतिज्ञेप्रमाणे नष्ट होईल असे ठरवले. जयद्रथवधाबद्दलही मी सविस्तर लिहिले आहेच.
१४ वे दिवशी द्रोणाने सर्व भर जयद्रथाला वाचवण्यावर दिला होता. त्याला सर्व कौरवसैन्याचे मागे ठेवले होते व सहा महावीराना दिवसभर अर्जुनाला आव्हान देऊन अदवून ठेवण्याचे काम दिले होते. त्याचा स्वतःचा बेत मात्र अजूनहि युधिष्ठिराला पकडण्याचाच होता. द्रोणाचा दुर्योधनाच्या आश्वासनावर विश्वास असावा व जयद्रथाचा बळी देऊन युद्ध संपवता येईल अशी आशा वाटली असावी कारण अर्जुन अखेर यशस्वी होईलच हे त्याला ठाऊक होते! मात्र दिवस अखेर होण्यापूर्वी जयद्रथ तर मारला गेलाच पण भीम आणि सात्यकी अर्जुनाच्या मदतीला गेले असतांहि एकट्या धृष्टद्युम्नाने युधिष्ठिराचा बचाव केला. आता द्रोणासमोर त्याच्याबरोबर अंतिम युद्ध येऊन ठेपले होते!