Get it on Google Play
Download on the App Store

11 कंटाळा

परवा माझा एक मित्र म्हणत होता की त्याला खूप  कंटाळा आला अाहे .कशामध्येही रस वाटत नाही .प्रत्येक मनुष्य नेहमी आपल्याला मानसिक व शारीरिक द्दष्ट्या कश्यात ना कशात सतत गुंतवून ठेवीत असतो. मित्र ,शाळेमधले कॉलेजमधले हॉस्टेलवरचे व्यवसायातील व इतर यांचे  ग्रुप करून, त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो .त्या शिवाय स्वतःची पत्नी व मुले वाचन नाटक सिनेमा इत्यादी मध्ये आपला वेळ घालवीत असतो .कधीतरी त्याला या सर्वांचा कंटाळा येतो व मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवावे असे वाटू लागते.भूतकाळातील निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या  कालखंडातील विविध आठवणी ,त्याचप्रमाणे भविष्यकाळातील ,भूतकाळातील   आपल्या अनुभवावर आधारित अश्या विविध योजना ,चिंतन मनन ध्यान धारणा नामस्मरण पूजा इत्यादींमध्ये मनाला गुंतवून ठेवीत असतो .त्याशिवाय व्यवसायातील किंवा नोकरीतील विचारही त्यामध्ये असतात .या शारीरिक व मानसिक गिरक्यामध्ये मनुष्य केव्हातरी दमून थकून जातो .त्याला सगळ्याचा कंटाळा येतो व सर्वच रसहीन वाटू लागते .आता आणखी दुसऱ्या कशामध्ये तरी आपले मन रममावे असे त्याला वाटू लागते .लहान मुलं, तरुण, मध्यम ,वयस्कर ,वृद्ध ,आपापल्या सर्कल प्रमाणे आपले मन गुंतवण्याचे मार्ग शोधीत असतात .केव्हा तरी त्यांना त्या सगळ्याचा कंटाळा येतो व मग ते म्हणतात की आता मी काय करू ?

इथे मला माझ्या एका नातीची गोष्ट आठवते .आम्ही तिला कोकणात घेऊन जात असू. तीही आमच्या बरोबर मोठ्या आवडीने येत असे.ती त्यावेळी दहा बारा वर्षांची असेल. तिला कंटाळा आला की ती जोरात ओरडून म्हणायची की दादाsss कंटाळा आला .हे सर्वांना इतके पाठ झाले की तिने नुस्ती दादा म्हणून हाक मारली, तरी बाकी सर्व कोरसमध्ये ओरडत असत की कंटाळा आला.  यावर एकच हशा पिके व त्यामध्ये तिचा कंटाळा काही वेळ निघून जाई .


    आपल्याला सारखे कशात ना कशात तरी गुंतून का पडावयाचे असते.?आपण रिकामे स्वस्थ का बसू शकत नाही ?समजा आपण एखादा निराळा  दुसरा वेळ घालविण्याचा मार्ग शोधून काढला तरी तिथेही पुन्हा कंटाळा येणार नाही कशावरून ?आपण घरच्या नेहमीच्याच जेवणाला काही वेळा कंटाळतो व मग  रुचीपालट म्हणून हॉटेलात जेवावयास जातो .नंतर हॉटेल्स बदलत रहातो!मनाचे असेच आहे. त्याला नेहमीच एकाच गोष्टीचा कंटाळा येतो .मग ते दुसरा मार्ग शोधू लागते.कंटाळा का येतो ?कितीही ठिकाणी मन गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी काही काळाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी मनाची  स्थिती होते.


काही केले तरी कंटाळा का येतो हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल , एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असेल ,तर त्या गोष्टींमध्ये आपण राहिले पाहिजे तरच ती आपल्याला समजू शकेल .त्यापासून दूर पळून ती कशी समजेल ?त्या प्रमाणेच कंटाळा म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल , तो का येतो हे जर समजून घ्यायचे असेल, तर कंटाळ्यापासून दूर न पळता आपण त्याचा स्वीकार   करून त्यामध्ये राहिले पाहिजे जर आपण त्यांच्या सोबत राहिलो तरच आपल्याला तो यथार्थतेने समजू शकेल .एकदा तुम्ही त्यांच्यासोबत राहण्याला सुरुवात केली की मग सर्व काही एकदम सोपे होईल .हळूहळू मी म्हणजेच कंटाळा सुखदुःख लोभ क्रोध मोह मत्सर द्वेष इत्यादी आहे हे लक्षात येईल.मग सर्व काही सोपे होईल कंटाळा किंवा इतर भावना त्याच राहणार नाहीत. मग काय होते हे ज्याने त्याने त्यामध्ये राहूनच अनुभवण्याची गोष्ट आहे .
११/६/२०१८   ©प्रभाकर  पटवर्धन 
 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण